महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : राज्य महिला आयोग झोपेत आहे का?

Vaishnavi Hagwane : हुंडाबळीच्या विरोधात विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा

Author

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाम भूमिका घेत सरकार आणि महिला आयोगावर जोरदार टीका केली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. एका पुरोगामी राज्यात आजही हुंड्यासारखी अमानवी प्रथा जीव घेत आहे, हे पाहून समाजमन अस्वस्थ झाले आहे. वैष्णवी हगवणे या पीडित विवाहितेचा मृत्यू झाल्याने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप लागले आहे. तिच्या सासऱ्याची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

घडलेल्या घटनेनंतर काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भेटीनंतर त्यांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. वैष्णवीच्या मृत्यूला आत्महत्या न मानता सरळसरळ हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ही सरळसरळ हत्या

वडेट्टीवार म्हणाले की, वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमांवरून या प्रकरणात काहीतरी लपवले जात आहे, हे स्पष्ट होते. पैशासाठी आणि हुंड्याच्या अमानवी मागण्यांसाठी तिचा छळ करण्यात आला. अखेर तिचा जीव घेतला गेला. इतकी गंभीर घटना घडूनही पोलीस यंत्रणा अजूनही संथगतीने काम करत असल्याचे त्यांनी खेदाने सांगितले.

Maharashtra : सरकारी नोकरीत भत्त्यांचा वसंत 

वडेट्टीवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या दुःखाने भारावून गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार, वैष्णवीच्या आई-वडिलांच्या वेदना शब्दांत मांडता येणाऱ्या नाहीत. त्यांनी सरकारला आवाहन केले की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळू शकेल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेल.

आयोगाच्या कार्यक्षमतेवर हल्ला

विजय वडेट्टीवार यांनी राज्य महिला आयोगावर देखील तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की, इतकी गंभीर घटना समोर असूनही आयोगाकडून कोणतीही तात्काळ आणि ठोस कृती न होणे हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. महिला आयोग एक संवैधानिक संस्था आहे. त्या संस्थेने स्वतःहून या प्रकरणात पुढाकार घेतला पाहिजे होता. मात्र त्याऐवजी आयोगाने केवळ तक्रार एका पोलीस स्टेशनकडे वळवून आपले कर्तव्य संपल्याचे दाखवले, हे खेदजनक आहे.

वडेट्टीवारांच्या मतानुसार, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये आयोगाची जबाबदारी फार मोठी असते. आयोगाने जर वेळेवर हस्तक्षेप केला असता तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचू शकला असता. राज्य शासनाने या प्रकरणात तात्काळ आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

सरकारला स्पष्ट मागणी

शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महिला आयोगाच्या उदासीनतेवर सवाल उपस्थित केले. मयुरी हगवणे यांनी वेळेत तक्रार दिली होती, परंतु आयोगाने ती केवळ पोलीस ठाण्याकडे फॉरवर्ड केली आणि पुढील कार्यवाही थांबवली. ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आयोग जेव्हा कारवाई करत नाही, तेव्हा अशा घटनांचे सत्र थांबत नाही.

घडलेल्या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सरकारकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. वैष्णवी आणि तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला न्याय मिळणं हीच खरी समाजाची आणि शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!