
महाराष्ट्रातील राजकारणाला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत असून, गुन्हेगारांना सरकारचे अभय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याऐवजी सत्ताधारी त्यांचे संरक्षण करत असल्याने लोकशाहीच संकटात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या मंत्र्यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. एका बाजूला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट दस्तावेजांच्या आधारे सरकारी सदनिका लाटल्याप्रकरणी शिक्षा झाली, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्यावर खून प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट हल्ला चढवला. तुरुंगवासाची शिक्षा झालेला मंत्री विधिमंडळात मंत्री म्हणून कामकाज करत असल्याचा प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असल्याचे ते म्हणाले. हा लोकशाहीचा अवमान असून, मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

Abu Azmi : औरंगजेबाचा महिमा गायला; ठरले कारण सभागृहाबाहेर जायला
नव्या वादाला सुरुवात
बनावट दस्तावेजांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका लाटल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, या शिक्षेवर स्थगिती मिळावी म्हणून कोकाटेंनी सत्र न्यायालयात अर्ज केला. विरोधकांनी या शिक्षेला स्थगिती देऊ नये म्हणून न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने त्यांना फेटाळले आणि सुनावणी पाच मार्चपर्यंत लांबणीवर टाकली. यामुळे सरकारचा वेळकाढूपणा स्पष्ट झाला आहे. दोषी ठरलेला मंत्री पदावरून हटवण्याऐवजी सरकार न्यायालयीन प्रक्रिया लांबवून त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
कायदा-सुव्यवस्थेची चाळण
महाराष्ट्रातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्रीय मंत्री रेखा खडसे यांच्या मुलीसोबत जळगावमध्ये छेडछाडीचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना सिद्ध करते की राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे आणि महिला सुरक्षित नाहीत. सत्ताधाऱ्यांनी गुंड आणि असामाजिक तत्वांना मोकळीक दिल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचीच सुरक्षितता धोक्यात असेल, तर सामान्य महिलांचे काय, हा प्रश्नच आता कालबाह्य वाटू लागला आहे. महाराष्ट्राला एकेकाळी आदर्श राज्य मानले जात होते, पण आता तो गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे.
भ्रष्टाचाराचे संरक्षक सरकार
सरकारने गुन्हेगारांना अभय देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप आता अधिक तीव्र होत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर खून प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची मागणी होत असताना, शिक्षाधीन मंत्री कोकाटे अजूनही सत्तेच्या खुर्चीवर बसले आहेत. जनतेच्या भावना पूर्णतः दुर्लक्षित करत हे सरकार भ्रष्टाचाराला उत्तेजन देत आहे.जर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कठोर निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रभर सरकारविरोधी आंदोलन छेडले जाईल. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर झाक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. पुढील काही दिवसांत सरकारसाठी आणखी अडचणी निर्माण होतील, हे मात्र नक्की.