
स्टॅम्प पेपर गैरवापर प्रकरणाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार अडचणीत सापडले आहेत. उच्च न्यायालयाच्या समन्समुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर संकटाचे ढग गडद होत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निवडणूक अर्जातील फसवणुकीच्या आरोपांमुळे कायदेशीर संकट घोंगावत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना समन्स बजावल्याने ब्रह्मपुरी मतदारसंघात राजकीय खळबळ माजली आहे.
वडेट्टीवार यांचा नामनिर्देशन अर्ज आणि त्यातील प्रतिज्ञापत्र संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यांनी बेकायदेशीर मार्गाने अर्ज वैध ठरवल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अॅड. नारायण जांभुळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली.

फसवणुकीचा आरोप
याचिकेनुसार, वडेट्टीवार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या स्वतःच्या नावाचा नाही. तो त्यांच्या पत्नीच्या नावाने खरेदी करण्यात आला होता. हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी घेतला असताना, त्याचा वापर बदलून प्रॉमिसरी नोट म्हणून केला गेला. ही बाब निवडणूक प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाने यावर सुनावणीसाठी समन्स बजावला आहे. निवडणूक कायद्यानुसार, एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या अर्जासाठी वापरणे हा स्पष्टपणे फसवणुकीचा प्रकार ठरतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवण्यात आले असून, त्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विरोधकांचा हल्लाबोल
आरोपांमुळे वडेट्टीवार आणि काँग्रेस पक्षाच्या प्रतिष्ठेवर गभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. हा संपूर्ण प्रकार काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेतील बेफिकिरी आणि अनैतिक कारभार दर्शवतो, असा आरोप करण्यात येत आहे. भाजपसह इतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, तर ते जनतेच्या विश्वासाला तडा देणारे ठरेल, असा इशारा दिला आहे.
राजकीय भवितव्य संकटात
विजय वडेट्टीवार हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. मात्र, या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक अर्जाशी संबंधित या फसवणुकीच्या आरोपांनी त्यांचा सार्वजनिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रात अशा प्रकारचे आरोप सहसा सहज बाजूला केले जातात, पण उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. जर हा आरोप सिद्ध झाला, तर वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसू शकतो आणि त्यांच्या आमदारकीवरही संकट येऊ शकते.
नवा पेच
काँग्रेस पक्षाने अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी पक्षासाठी ही परिस्थिती अत्यंत अवघड बनली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. जर हा मुद्दा अधिक गाजला, तर आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी ही एक मोठी अडचण ठरू शकते. पक्षाने जर योग्य रणनीती अवलंबली नाही, तर वडेट्टीवार यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
पुढील निर्णयाकडे लक्ष
सध्या हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने वडेट्टीवार यांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. जर न्यायालयाने त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली, तर त्यांना राजकीयदृष्ट्या मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षासाठी ही एक मोठी कसोटी ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील सुनावणीवर लागले आहे, कारण त्यावरच वडेट्टीवार यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.