
वलमाझरी ग्रामपंचायतीत कर भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या क्रमांकासाठी थेट हैदराबाद विमान प्रवासासह विविध बक्षिसांची योजना आखण्यात आली आहे.
प्रगतीचा नवा अध्याय लिहित भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील खैरी-वलमाझरी गटग्रामपंचायतीने पुन्हा एकदा समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. स्वच्छता, हरितता आणि सामाजिक सहभागाच्या क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या या ग्रामपंचायतीने आता कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे आणि तीही थेट ‘नागपूर-हैदराबाद विमान प्रवासासह’.
गेल्या 23 एप्रिल 25 रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, येणाऱ्या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2025- 26 सालातील घर कर, पाणीपट्टी आणि याआधीचे सर्व थकबाकी कर येत्या 15 मे 2025 पर्यंत भरणाऱ्या नागरिकांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या ड्रॉचा पहिला क्रमांक पटकावणाऱ्या कुटुंबातील एका भाग्यवान सदस्याला नागपूर ते हैदराबाद ‘विमान प्रवास’, हैदराबादमध्ये निवासाची सुविधा आणि परतीसाठी रेल्वेने वातानुकूलित प्रवास अशा रोमांचक भेटीची संधी मिळणार आहे.

चांदीही मिळणार चमचमीत
लकी ड्रॉचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पहिल्या क्रमांकासाठीच नव्हे तर इतर क्रमांकांसाठीही असलेली आकर्षक बक्षिसांची शृंखला. पहिल्या क्रमांकासाठी नागपूर-हैदराबाद विमान प्रवासाची संधी असेलच. पण दुसऱ्या क्रमांकासाठी तब्बल शंभर किलो ‘जय श्रीराम’ ब्रँडचा तांदूळ देण्यात येणार आहे. तिसऱ्या क्रमांकाने निवड झालेल्या कुटुंबातील पाच जणांना थेट नागझिरा अभयारण्याची सफारीची मजा लुटता येणार आहे. चौथा क्रमांक मिळवणाऱ्यांना 20 किलो तुरीची डाळ, तर पाचव्या क्रमांकाला एक संपूर्ण टिन खाद्यतेल असे व्यावहारिक व उपयोगी बक्षिसे मिळणार आहेत. इतकेच नव्हे, सहाव्या क्रमांकाला खास एक चांदीचा चमचमीत शिक्का देण्यात येणार आहे. जो घरात आठवण म्हणून जपता येईल. अशा या विविध पुरस्कारांमुळे गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
Chandrashekhar Bawankule : पाण्याच्या थेंबासाठी शाश्वत नियोजनाची तयारी
याचबरोबर, सर्व कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला मोफत कणिक दळून मिळणार असून, त्यांना शुद्ध आरो पाण्याची मोफत सुविधा देखील ग्रामपंचायतकडून दिली जाणार आहे. परिणामी, खैरी, वलमाझरी, पिटेझरी आणि आमगाव या चार गावांच्या कुटुंबांमध्ये आता कर भरण्याबाबत उत्साह आणि स्पर्धा दोन्ही वाढत आहेत. या गटग्रामपंचायतीला यापूर्वीही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि केंद्र शासनाचा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ अशा अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांचा हेतू पुरस्कार मिळवणे नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवणे हा आहे.
उपक्रमामुळे जागृती
सरपंच रुखमोडे म्हणाले, आमचा उद्देश केवळ बक्षिसे वाटणे नाही, तर गावकऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे आणि त्यांच्यात सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे आहे. आम्हाला आमची ग्रामपंचायत महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात ओळखली जावी असे वाटते. या उपक्रमामुळे गावात स्वच्छता, हरितता, निरोगी जीवनशैली आणि कर भरण्याचे महत्त्व याची जाणीव अधिक गहिरवली जाणार आहे. ग्रामपंचायतीचे सचिव, कर्मचारी, वरिष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य यामागे महत्त्वाचे आहे.
गावातील आरोग्यसेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यासाठी खैरी-वलमाझरी ग्रामपंचायत सातत्याने पुढाकार घेत आहे. करसंकलनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून भविष्यात अधिक मोठ्या योजना राबवता येणार आहेत आणि यासाठी गावकऱ्यांचा स्वयंस्फूर्त सहभागच खरी ताकद आहे. हा अनोखा उपक्रम ग्रामीण भारताच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरणार असून, खैरी-वलमाझरी ग्रामपंचायत हे नाव लवकरच देशाच्या प्रगतीच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित होईल, यात शंका नाही.