
डॉ. परिणय फुके यांनी वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात वक्फ बोर्ड विधेयकाची मोठी चर्चा रंगली आहे. या विधेयकामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटावर सत्ताधारी पक्ष चांगलेच आक्रमक होतांना दिसत आहेत. त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र टीकेनंतर आता यामध्ये भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनीही उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
वक्फ बोर्ड या वादग्रस्त विधेयकावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन एप्रिल रोजी संसदेत चर्चा होत आहे. भारतीय जनता पक्षाने हे विधेयक संमत करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार वादविवाद रंगत असल्याचे दिसून येत आहे. परिणय फुके यांनी सोशल मीडिया एक्सवर (Twitter) पोस्ट करत लिहिले की, आज संसदेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेत कोण हिंदुत्वासाठी जागं आहे, याचा निवाडा होईल. ठाकरे गटाची भूमिका ठरवेल की ते खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत की नाही.

Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या हक्काचा उजळणार दिवा, माजी मंत्र्याचा निर्धार नवा
फडणवीसांचा आरोप
परिणय फुके यांनी पुढे म्हटले की, आता पाहूया, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपतात की राहुल गांधी यांच्या मार्गावर चालत तुष्टीकरणाची भूमिका घेतात? अशी घणाघाती टीका करत फुके यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शिवसेना ठाकरे गट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की तुष्टीकरणाच्या मार्गावर जाणार? असा खोचक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता.
वक्फ कायदा प्रथम ब्रिटिश राजवटीत 1923 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यावेळी त्याला मुसलमान वक्फ कायदा 1923 असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये भारत सरकारने पहिला अधिकृत वक्फ कायदा संमत केला. त्याअंतर्गत केंद्रीय वक्फ परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी वक्फ बोर्डाचे अधिकार मर्यादित होते. मात्र, 1995 मध्ये नरसिंह राव सरकारने 1954 कायदा रद्द करून नवीन वक्फ कायदा मंजूर केला, ज्यामुळे वक्फ बोर्डाला अधिकाधिक अधिकार बहाल करण्यात आले.
Parinay Fuke : राजकारणाचा ग्रँडमास्टर, आता बुद्धिबळाच्या पटावर
संसदेत या विधेयकावर मोठा वाद रंगणार आहे. भाजपाने या विधेयकाच्या पाठिंब्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे, तर विरोधकही त्याला रोखण्यासाठी तयारीत आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधेयक संमत झाल्यास देशाच्या कायदा व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.