
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. चाकुनं हल्ला झाल्यामुळं त्याचा दुखापत झालं आहे. यावरून आता राजकारण सुरू झालं आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला दुपारी 3 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीकडून सरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली आहे.
सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यात सैफच्या घरातील मोलकरीण अरियामा फिलिप ऊर्फ लीमा हीदेखील जखमी झाली आहे. सैफ अली खान फॉर्च्यून हाईट्स, खार येथे राहतो. एक व्यक्ती सैफच्या घरात घुसला आणि त्याने मोलकरणीसोबत वाद घातला. सैफ तिच्या मदतीला आल्यानंतर त्यानं त्याच्यावर हल्ला केला. हाय सिक्युरिटी सोसायटीत हल्लेखोर कसा घुसला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

विरोधकांनी घेरलं
सैफवरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मुंबईत हे सर्व सुरू असताना मुंबई पोलिस, आयुक्त आणि पोलिस महासंचालक काय काम करत आहेत? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. अलीकडच्या काळात सलमान खान यांच्या घराबाहेर देखील गोळीबार झाला आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. हे महाराष्ट्रात काय सुरू आहे, असं त्या म्हणाल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना फोन केला. मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा, मी लगेचच मदत करेल, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले. आपण प्रत्येकाच्या वैयक्तिक खासगी आयुष्याचा आदर केला पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मोघम प्रतिक्रिया दिली आहे.
सरकारवर Sanjay Raut यांची टीका
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सैफ प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे? कुठेही कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरं यामध्ये सरकार गुंतून पडलं आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
सैफ 15 दिवसांपूर्वी कुटुंबासह मोदींना भेटायला गेले होते. पंतप्रधान मोदींनी एक तास त्यांच्या कुटुंबासह घालवला होता. राज्याची 90 टक्के सुरक्षा आणि पोलिस हे आमदार, फुटलेल्या लोकांसाठी आहेत. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते. सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान यांना सुरक्षित राहू शकत नाही हे वास्तव आहे असंही संजय राऊत म्हणाले.