
वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी संपूर्ण कुटुंबाच्या किडनी विक्रीची जाहिरात दिली. सरकारच्या अपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनामुळे आणि शेतीतील तोट्यामुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला.
महाराष्ट्रात सध्या शेतकरी आणि कर्जमाफीवरून पक्ष विपक्षात चांगलेच घमासान सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातून आलेली ही एक जाहिरात पाहून हृदय द्रवेल. एका शेतकऱ्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या किडनी विक्रीसाठी जाहिरात दिली आहे. हे ऐकून धक्का बसला ना? पण ही फक्त एक जाहिरात नाही, तर महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेच्या विफलतेची रक्ताने लिहिलेली हकीकत आहे. वाशिमच्या अडोळी गावातील सतीश इढोळे या शेतकऱ्यावर कर्जाचा एवढा डोंगर उभा राहिला आहे की, त्याला आता त्याचा स्वतःचा शरिरही विकावा लागत आहे. सोशल मीडियावर सध्या ही जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. यामागचं कारण म्हणजे हे केवळ एक जाहिरात नव्हती, तरी महाराष्ट्राच्या फसलेल्या विकासाची ती एक अंत्ययात्रा होती.
सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की, शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज फेडावे. मग कर्ज फेडायला पैसे नाहीत, तर काय करावं? इढोळे यांनी हातपाय गाळून न बसता आपल्या पत्नी, मुलं आणि स्वतःची किडनी विक्रीसाठी काढली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाहीही देण्यात आली होती. मात्र, ही आश्वासने आता हवेत विरल्यासारखी वाटत आहेत. अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना काहीतरी मिळेल, या अपेक्षेने ते डोळे लावून बसले होते. पण दुर्दैवाने, त्यांनाही पुन्हा रिकाम्या हाताने परतावं लागलं.

व्यवस्थेचे अपयश
सातबारा कोरा करू असं सांगण्यात आलं, पण नंतर सांगितलं की कर्ज भरा. पण कसं भरणार? शेतातल्या सोयाबीनला तीन हजार रुपयेही मिळत नाहीत. बियाणं महाग, खत महाग, आणि बाजारात माल विकण्यासाठी भाव नाही. मग शेतकऱ्याने काय करावं? या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सतीश इढोळे यांनी थेट बाजारात स्वतःचा फलक लावून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या किडनीची किंमत 60 हजार, पत्नीची 40 हजार, मोठ्या मुलाची 20 हजार, आणि लहान मुलाची फक्त 15 हजार ठेवली आहे. ही किंमत ऐकून धक्का बसतो, पण त्यांच्यासाठी ही बोली नव्हे, तर शेवटचा पर्याय आहे.
इढोळे यांनी प्रश्न विचारला, शेतकऱ्याने शेतमाल विकावा तरी कुठे? आम्हाला सतत आश्वासनं दिली जातात आणि निवडणुकीनंतर आम्हाला विसरलं जातं. आता पुढची पेरणी करायची पण कशी? महाराष्ट्राच्या कृषी धोरणांची पोलखोल करणारी ही घटना आहे. एका कुटुंबाने कर्जमाफीच्या खोट्या वचनांना कंटाळून स्वतःच्या शरीराचे अवयव विकण्याची वेळ यावी, ही व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे. सरकारच्या अपयशामुळे शेतकरी रस्त्यावर उभे आहेत, कर्जात बुडालेले आहेत, आणि आता तर स्वतःचा देह विक्रीला काढत आहेत. हा शेतकऱ्याचा हंबरडा ऐकला नाही, तर उद्या संपूर्ण समाजाला त्याचा मोठा फटका बसेल.