
नागपूर जिल्ह्यातील जलसंकटावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांनी एक हजार 500 जलस्रोत पुनर्जीवित करण्याचे निर्देश दिले.
नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड तालुका आणि इतर काही गावांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवते. तर काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने नद्या, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहतात. परिणामी महापुरासारखी परिस्थिती निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर मातीचे नुकसान होते. या जलसंकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किमान एक हजार 500 जलस्रोत पुनर्जीवित करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
नागपूर जिल्ह्यात सुमारे चार हजार 500 लहान-मोठे जलस्रोत, बंधारे व धरणे आहेत. अनेक जलस्रोत मोठ्या प्रमाणावर गाळाने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे लहान नद्या आणि ओढ्यांमधील गाळ काढण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे जलस्रोत पूर्ववत केल्यास मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण होऊ शकतो. यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागप्रमुखांना या कामावर तातडीने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.

Mahyuti : फडणवीसांच्या ट्रॅफिक सिग्नलसमोर शिंदेंची बस ‘नो एन्ट्री’ मध्ये अडकली
जलस्त्रोतांचे मजबुतीकरण
पालकमंत्री बावनकुळे यांनी खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विहिरी दुरुस्ती, गाळ काढणे आणि जलस्रोतांचे मजबुतीकरण यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले. सरकारच्या निर्णयानुसार जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 31 रुपये प्रति घनमीटर दर ठरविण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. स्वीकृत योजनांची अंमलबजावणी वेळेत होईल याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाच्या कामांसाठी उत्कृष्ट नियोजन आणि अभियंता कौशल्याची आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे अशी क्षमता आहे का, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि शासकीय यंत्रणांमार्फत नामांकित ठेकेदारांकडून ही कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं
निधी कमी नाही
यासंदर्भात जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीचे आयोजन नियोजन भवन, सिव्हिल लाईन्स येथे पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या बैठकीस वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल देखील उपस्थित होते. आशीष जयस्वाल म्हणाले, निधीची कोणतीही अडचण नाही. जलसंकटावर उपाययोजना करताना संपूर्ण क्षमतेने नियोजन करा. योजना आखताना अचूक अंदाज महत्त्वाचा आहे. कारण जर तो चुकीचा असेल, तर कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल, असे वित्त राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी सांगितले.
जलसंकटग्रस्त गावांसाठी जे उपाययोजना राबवल्या जातील. त्यांची नावं यादीतून वगळली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहरी आणि महानगरीय भागातील विहिरींची सफाई व पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मनपाला विभागनिहाय नियोजन सादर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले.
नागपूर जिल्ह्यातील वार्षिक जलसंकट आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जलसंधारण हीच एकमेव प्रभावी उपाययोजना आहे. यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.