
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात, विशेषतः विदर्भमध्ये, बनावट बियाण्यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. राज्यभरातील शेतकरी आता पेरणीसाठी युद्धपातळीवर तयारी करताना दिसत आहेत. कापूस, मका, सोयाबीन या प्रमुख खरीप पिकांसाठी बियाण्यांची बाजारात मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु या मागणीच्या सावलीत एक काळी बाजूही समोर येत आहे. नकली बियाण्यांची काळी बाजारपेठ. सध्या काही संधीसाधू बियाणे आणि खत माफियांनी शेतकऱ्यांच्या विश्वासावर गदा आणली आहे. प्रवासी गाड्यांच्या माध्यमातून प्रतिबंधित बियाण्यांची चोरटी तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून, शेतकऱ्यांच्या हाती नकली बियाण्यांची पोती पडत आहेत.
कृषी आणि पोलीस विभागांनी संयुक्तपणे मोहीम उघडली असली, तरी माफियांच्या जाळ्याला पूर्णपणे छेद देणे अजून बाकी आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात बोगस एचटीबीटी कापसाच्या बियाण्यांचा मोठा साठा पकडण्यात आला आहे. गेल्या तीन आठवड्यांत विविध पथकांनी 12 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 4 हजार 429 बियाण्यांचे पॅकेट आणि तब्बल 800 किलो उघड्या स्वरुपातील बियाणे जप्त करण्यात आले. या बोगस मालाची किंमत सुमारे 62 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. मात्र, या संपूर्ण कारभाराचा मास्टरमाइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Prashant Padole : मुख्यमंत्र्यांच्या दारात धगधगणार गोसेखुर्दचा संघर्ष
गुजरात कनेक्शन
तपास यंत्रणांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या वेगाने ही तस्करी चालली आहे, त्या पार्श्वभूमीवर ही साखळी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, हा सवाल आता उपस्थित होत आहे. या नकली बियाण्यांचे धागेदोरे गुजरात, विशेषतः अहमदाबाद परिसराशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे. हे बोगस बियाणे गुजरातमधून प्रवास करून महाराष्ट्रात पोहोचते. वितरणाची मुख्य वाहिनी पुणे बनली असून, या मागे असलेली मालिका आणि मास्टरमाइंड अद्यापही अंधारात आहे. याच मुद्द्यावरून अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या बियाण्यांच्या मागे एखाद्या मोठ्या गुजरातच्या नेत्याचा हात आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला.
इतकेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्र लिहून याप्रकरणी तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. वानखेडे म्हणाले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच अमरावती पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन थेट तपास करावा. या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. दरम्यान, बाजारात नकली बियाण्यांचा इतका मोठा साठा मिळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. खरीप हंगाम दरवाज्यात आलेला असताना, विश्वासार्ह बियाण्यांचा पुरवठा होईल का, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे.
Rahul Narwekar : हेरिटेज टिकवून हिरवळीत बहरणार नागपूर विधानभवन
राज्य शासनाने आणि कृषी विभागाने आता अधिक कडक तपासणी मोहीम राबवली नाही, तर हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगाम धोक्यात येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर शासनाची आणि पोलिसांची पुढील पावले काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.