
राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषेची सक्ती निर्णयावरून राज्यात तीव्र संताप उसळला असून विरोधकांनी मराठी भाषेच्या अपमानाचा मुद्दा उचलत सरकारवर टीकास्त्र सोडले.
राज्य सरकारने शालेय शिक्षणात ‘तिसऱ्या भाषेची सक्ती’ करण्याचा निर्णय घेताच, महाराष्ट्रात एक वेगळीच आंदोलनाची लाट उसळली आहे. मराठी भाषिक समाजाच्या मर्मावर घाव घालणाऱ्या या निर्णयामुळे भाषा प्रेमींमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ‘मराठीचा अपमान सहन करणार नाही’ या घोषणांनी राज्यातील हवा तापू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. ‘त्रिभाषा सूत्रा’संदर्भात सखोल चर्चा झाली आणि कोणताही निर्णय सल्लामसलतीशिवाय घेतला जाणार नाही, असा दिलासा देण्यात आला. बैठकीत एका सर्वसमावेशक सादरीकरणाच्या तयारीसाठी आदेश दिले गेले.
परंतु जनतेचा राग एवढा उफाळून आला आहे की, निर्णयावरील स्पष्टीकरण पुरेसे ठरत नाही. दरम्यान, भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या ७५ वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र विधानभवनात २३ व २४ जून रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात संसद, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे प्रमुख आणि सदस्य सहभागी झाले. महाराष्ट्राचे संसद सदस्य व दोन्ही सभागृहांचे सदस्य देखील उपस्थित राहिले. या कार्यक्रमात ‘अल्पव्ययात प्रशासनाची कार्यक्षमता’ या विषयावर विचार मंथन झाले. मात्र, या समारंभाचे निमित्त साधून एक वेगळा राजकीय वाद उद्भवला आहे.

Prataprao Jadhav : ज्ञानाच्या मंदिराकडे बैलगाडीने केला प्रवास
फलकावरील मराठी गायब
कार्यक्रमाच्या फलकावर मराठी भाषेचा उल्लेख नव्हता. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘दिल्लीच्या मर्जीने महाराष्ट्र चालवण्याचा प्रकार सुरू आहे. आता तर मराठी भाषेचा अपमान खुल्या डोळ्यांनी होत आहे, असे ठणकावून सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. कार्यक्रमाचे पोस्टर पाहा आपल्या मातृभाषेला स्थान नाही. हे केवळ भाषेचे नव्हे, तर अस्मितेचे अपमान आहे, असे म्हणत ठाकूर यांनी मराठी जनतेच्या भावना व्यक्त केल्या.
कुसक्या कण्याचं नेतृत्व महाराष्ट्र झेलतोय, पण मराठी माणूस हे जास्त काळ सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ‘त्रिभाषा सूत्र’ असो वा राष्ट्रीय परिषदेतील मराठीचा अपमान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षाला आता भाषेची धार लाभली आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, मराठीची गळचेपी थांबवावी, अशी मागणी मोठ्या स्वरात होत आहे. राज्यातील जनभावना पाहता हे स्पष्ट आहे मराठीसाठी लढण्यास जनता पुन्हा सज्ज झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही, तर ‘महाराष्ट्र हा दिवस देखील तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाही’ असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी दिला.