
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि एक रुपयातील विमा योजनेची आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
2024 विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आता फसवी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून जोरात करण्यात येत आहे. प्रचारादरम्यान गाजलेली एक रुपयात पिक विमा योजना आणि संपूर्ण कर्जमाफीच्या घोषणा, सत्तेवर आल्यानंतर केवळ कागदांवरच राहिल्याचा आरोप आता अधिक तीव्र होतो आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने कर्जमाफीसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. एक रुपया विमा योजना थांबवण्यात आल्यामुळे असुरक्षिततेचं सावट वाढलं आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल करत, महायुती सरकारवर विश्वासघाताचा ठपका ठेवला आहे. ठाकूर यांनी थेट सरकारवर आरोप करत म्हटलं की, हे सरकार म्हणजे प्रचारकी योजनांच्या माध्यमातून फसवणुकीचा किल्ला उभा करणारे कारस्थानी आहेत. एक रुपयातील पिक विमा योजना ही केवळ निवडणूक प्रचारासाठी आणली होती. निवडणूक संपल्यानंतर, ही योजना संपूर्णपणे बंद केली गेली. शेतकऱ्यांना दिलेले वचन पायदळी तुडवून, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे.

सावकारीचं संकट
ठाकूर यांचे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या घोषणा करणारे हे सरकार सत्तेत आल्यावर मात्र नुकसानभरपाईच्या रकमेत कपात करून संकटात असलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा करत आहेत. तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाईचा बडेजाव करण्याचं ढोंग करून, प्रत्यक्षात मदतीचा हात मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पतपुरवठा करण्याबाबत सरकारी बँका हात आखडता घेत असल्याने, शेतकऱ्यांना पुन्हा सावकारांच्या दारात जावं लागतंय.
फसव्या आश्वासनांमुळे निर्माण झालेला हा सावकारी पाश, सरकारचं महापाप असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. यशोमती ठाकूर यांचा आरोप आहे की, महाभ्रष्टयुती सरकार केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठीच योजना आणते आणि सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हिताला दुय्यम स्थान देतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागेही हेच जुलमी धोरण कारणीभूत असल्याचा घणाघात त्यांनी केला. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, असं गाजावाजा करून सांगितलं गेलं. पण निवडणुकीनंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली.
ना कर्जमाफी, ना नुकसानभरपाई, ना विश्वासाचा आधार. या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी आता फसवणुकीचा बळी ठरत आहेत. ठाकूर यांचं ठाम मत आहे की, महायुती सरकार म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलं जुलमी सरकार आहे. फक्त निवडणुकीच्या राजकारणासाठी योजना आणणं आणि सत्तेत आल्यावर त्याच योजनांना गुंडाळून टाकणं, ही त्यांची एकमेव नीती आहे.