
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या शासन आपल्या मोबाईलवर उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजना व माहिती सोप्या भाषेत त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.
यवतमाळ सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करत आहे. पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे हेच शासनाचे ध्येय आहे, असे स्पष्ट करताना पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. शासन आपल्या मोबाईलवर या नावाने सुरू करण्यात आलेल्या या डिजिटल उपक्रमामुळे प्रशासन आणि जनतेमधील सुसंवाद अधिक सशक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा उपक्रम म्हणजे केवळ माहिती देणारे एक माध्यम नाही, तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर मिटवणारे एक डिजिटल सेतु आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम नागरिकांपर्यंत शासकीय योजना, कायदे आणि उपक्रमांची माहिती अगदी सहज आणि सोप्या भाषेत पोहोचवतो. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमात आता कृषी विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. खरीप हंगामासारख्या महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरणारी माहिती त्यांच्याच मोबाईलवर मिळणार असल्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

Devendra Fadnavis : कर्जाला वाट मोकळी करा, अन्यथा कारवाईचा वज्रघात
महसूल विभागाचे मार्गदर्शन
माती परीक्षणापासून ते बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, पेरणीपूर्व बीज प्रक्रिया, फळबाग लागवड योजना, अष्टसुत्री पद्धती, हुमणी अळीचे व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश केलेले 9 माहितीपूर्ण व्हिडीओ चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या युट्युब चॅनेलवर महसूल विभागाशी संबंधित 24 व्हिडीओ आधीच प्रसारित झाले होते. त्यामध्ये सातबारा, फेरफार, वनहक्क कायदा, शिधापत्रिका, कलम 155 दुरुस्ती, नैसर्गिक आपत्ती, जमीन नोंदणी, वारस नोंदी, मतदार नोंदणी, अतिक्रमण नियमितीकरण, पोटखराब जमीन उपयोग आणि अन्य महत्त्वाच्या विषयांची माहिती देण्यात आली आहे.
राज्य आणि केंद्र शासन नागरिकांसाठी असंख्य योजना राबवत असते. मात्र, योग्य माहिती अभावी अनेक जण त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. हीच अडचण लक्षात घेता ‘शासन आपल्या मोबाईलवर’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, लवकरच अन्य शासकीय विभागांच्या योजनाही यात सामील होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या चॅनेलवर लवकरच सामाजिक सुरक्षा योजना, अर्धन्यायिक प्रक्रिया, गौण खनिज, आदिवासी जमीन व्यवहार आदी विषयांवरही व्हिडीओ अपलोड होणार आहेत.
पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्घाटनप्रसंगी प्रशासनास मार्गदर्शन करताना म्हटले, शेतीसंबंधी तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विषय प्राधान्याने घ्या. छोट्या पण प्रभावी व्हिडीओजच्या माध्यमातून माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचते. अतिशय कमी कालावधीत या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून सध्या 45 हजारांहून अधिक नागरिकांनी याचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. जिल्ह्याबाहेरील नागरिकांचाही यात सहभाग असल्याने याचा प्रभाव आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.