
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पुढची पायरी म्हणून, जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या मोबाईलवर” हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता नागरिकांना शासकीय योजना, प्रक्रिया आणि आवश्यक प्रमाणपत्रांची माहिती मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम फक्त यवतमाळपुरता मर्यादित न राहता, भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी या उपक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाने राज्यात पहिल्यांदाच असा उपक्रम सुरु करून शासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिशीलता आणि नागरिकाभिमुखता साधण्याचा आदर्श निर्माण केला आहे. ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमात यवतमाळ जिल्ह्याच्या महसूल विभागाने अधिकृत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध महत्त्वाच्या शासकीय सेवांची व्हिडिओ स्वरूपात माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.
मार्ग सोपा
जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी,विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद. शिधापत्रिका, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी, अतिक्रमण नियमितीकरण, नैसर्गिक आपत्ती नोंदणी. जन्म व मृत्यूची उशिरा नोंदणी प्रक्रिया, शेतीसंदर्भातील आवश्यक दक्षता व सावधगिरी, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया. सामाजिक अर्थसहाय्य योजना, गौणखनिज माहिती, आदिवासी जमिनीचे व्यवहार व त्यावरील नियम. या चैनल वर व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे.

सर्व माहितीचे सादरीकरण उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले गेले आहे. त्यांनी अतिशय सोप्या भाषेत संबंधित विषय समजावून सांगितले आहेत. नियम, अटी, आवश्यक कागदपत्रे आणि काळजी घेण्याचे मुद्दे यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये
उपक्रमामुळे मोबाईलवरून कुठेही आणि कधीही माहिती मिळवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. वेळ, पैसा आणि श्रमांची बचत होणार. शासनाशी थेट आणि पारदर्शक संवाद साधता येईल. ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही सहज माहितीची उपलब्धता. शासकीय प्रक्रियेबाबत गैरसमज दूर होऊन विश्वास वाढण्यास मदत होणार. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या पुढाकारातून अवघ्या काही दिवसांत हा उपक्रम उभा राहिला असून, तो राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे. नागरिकांना घरबसल्या माहिती व सेवा देण्याच्या या क्रांतिकारी पद्धतीमुळे शासकीय यंत्रणेचा कार्यकाळ लक्षणीयरीत्या गतिमान होणार आहे.
प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसीलदार आदित्य शेंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “या उपक्रमामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद वाढेल, विश्वास वृद्धिंगत होईल आणि डिजिटल युगात प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल. नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे असलेले यवतमाळ, “शासन आपल्या मोबाईलवर” या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे सक्षमीकरण करत आहे. शासन-नागरिक यांच्यातील अंतर डिजिटल तंत्र ज्ञानाने कमी करत आहे.