
महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात 25 फेब्रुवारी रोजी दुपारी एक गंभीर प्रकार घडला. महसूल विभागाकडे सात-बारावर नाव नोंदवण्याच्या मागणीसाठी आलेल्या एका तरुणाने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, याआधीच्या घटनांमधून धडा घेत प्रशासनाने मंत्रालयाच्या परिसरात संरक्षण जाळी बसवली असल्याने मोठा अनर्थ टळला. या तरुणाने उडी मारताना “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणा देत आपली मागणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःहून पत्रकं छापली होती आणि ती हवेत उडवत आंदोलन केलं.
या घटनेची माहिती मिळताच मंत्रालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला सुखरूप बाहेर काढले आणि ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून सात-बाराच्या नोंदणीसंबंधी पत्रके जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक चौकशीत समोर आले की, त्याला महसूल विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी त्याला अधिक चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले असून, या घटनेने मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Cabinet Meeting : दादांच्या बारामतीला खास कॉलेज
उड्या मारण्याची परंपरा?
मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्रालयावरून उडी मारणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. याआधीही अनेक आंदोलक आणि व्यथित नागरिकांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे. मंत्रालय हे राज्य प्रशासनाचे हृदयस्थान असल्याने, तिथे आपली व्यथा मांडण्यासाठी लोक येतात. मात्र, मागण्या ऐकून न घेतल्यास लोक हताश होऊन अशा प्रकारचे कृत्य करतात. पूर्वीच्या घटनांमधून धडा घेत सरकारने संरक्षण जाळी लावली, त्यामुळे जीवितहानी टळत आहे. पण नागरिक अशा प्रकारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यास का भाग पाडले जात आहेत, हा अधिक चिंतेचा विषय आहे.
मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक असल्याने मंत्रालयात मंत्र्यांचे पीए, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा गजबजलेल्या वातावरणात कुणीतरी मंत्रालयात सहज प्रवेश करून संरक्षण जाळीवर उडी मारतो, हे गंभीर बाब आहे. यामुळे सुरक्षेच्या पद्धतींमध्ये मोठ्या सुधारणा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. केवळ संरक्षण जाळी लावणे हा यावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांवर अधिक कडक तपासणी होणे गरजेचे आहे, तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ आणि प्रभावी पद्धतीने निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.