
पहलगाम हल्ल्यात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याने, भारतीय लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर विरोधात पोस्ट करणाऱ्या युवकाला अटक.
सीमेवर भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांविरोधात लढा उभारला असताना, देशाच्या हृदयस्थानी, नागपुरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्याचं भारतीय लष्कर चोख प्रतिउत्तर देत असतांना एका तरुणाने याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केले आहे. केरळमधील रहिवासी असलेला 26 वर्षीय तरुण रजास सिद्दिक, भारतीय लष्कराच्या या ऑपरेशनविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करताना आढळल्याने त्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.
रजास सिद्दिक हा पत्रकार असल्याचे सांगितले जात असून, तो नुकताच दिल्ली येथे झालेल्या एका परिषदेत सहभागी होऊन केरळला परतत होता. प्रवासादरम्यान नागपुरात थांबलेल्या रजासची गुप्तचर संस्थांनी घेतलेली माहिती अतिशय गंभीर असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी मारवाडी चौकातील एका हॉटेलमध्ये छापा टाकत रजासला ताब्यात घेतले. पोलिसांनी रजासच्या मोबाईलची झडती घेतली असता, त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर तसेच छत्तीसगडमधील ऑपरेशन कगार विरोधात असलेले अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आढळले.

माओवादाचे समर्थन
इतकेच नव्हे तर सीपीआय दहशतवादी या बंदी घातलेल्या संघटनेच्या समर्थनार्थ असलेले दस्तऐवज, भारत सरकार आणि भारतीय लष्कराविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट्स देखील आढळल्या. इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये तर ऑपरेशन सिंदूर हा मानवतेविरोधी हल्ला आहे अशा प्रकारचा पाकिस्तानपुरस्कृत मजकूर देखील सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा आशयाच्या पोस्ट्समुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी यावर कडाडून निषेध व्यक्त केला आहे.
रजासने दिल्लीतील एका परिषदेत सहभाग घेतला होता, जिथे नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ बोलणारे पत्रकार उपस्थित होते. पोलिसांच्या मते, रजास हा डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशनशी संबंधित असल्याचा संशय आहे. नागपूरमधील एका मैत्रिणीसोबत भेटण्यासाठी तो येथे थांबला होता. मात्र त्याच्या उपस्थितीचा हेतू संशयास्पद असल्याने त्याच्याविरुद्ध अँटी नक्षल ऑपरेशन युनिटनेही स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. नागपूर पोलिस आणि अँटी नक्सल ऑपरेशनचं पथक सध्या रजासची सखोल चौकशी करत आहे.
Operation Sindoor : अनिल देशमुख यांनी वाढदिवस केला राष्ट्राला अर्पण
लष्करविरोधी आरोप
याप्रकरणी अजून काही अटक होण्याची शक्यता असून, सोशल मीडियावर देशविरोधी लिखाण करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. या घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका बाजूला ऑपरेशन सिंदूरमधील जवानांचे शौर्य आणि त्यागाला सलाम करणारे लाखो भारतीय आहेत. तर दुसरीकडे देशविरोधी मजकूर लिहिणाऱ्या आणि पाकिस्तानचे अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्या व्यक्तींचा निषेध केला जात आहे.