
नागपूरच्या सदर उड्डाणपूलाच्या चुकीच्या रचनेमुळे रहदारीत मोठा गोंधळ आणि वाहतुकीचा मोठा त्रास सुरू आहे. ज्यामुळे मार्ग बंद होऊन वाहनांना अरुंद गल्लींतून जाण्याचा पर्याय भाग पडतो.
नागपूरच्या मध्यवर्ती भागात वसलेला सदर उड्डाणपूल नागरिकांसाठी वरदान ठरावा अशी अपेक्षा होती. मात्र तो सध्या वाहतूक गोंधळाचे मूळ कारण ठरला आहे. लँडिंगची रचना चुकीची झाल्यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण कायम आहे. या महत्त्वाच्या उड्डाणपूलामुळे रहदारी सुलभ होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची बनली आहे. अखेर याची कबुली दिली गेली असून, या त्रुटीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून तब्बल ३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पूल वाहतुकीसाठी सुलभता निर्माण करणार होता. पण प्रत्यक्षात त्याने नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्यात अडथळेच उभे केले.
नितीन गडकरी हे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदांमध्ये सहभागी होत आहेत. नागपूरचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सदर उड्डाणपूलाच्या बांधकामात झालेल्या त्रुटींचा उल्लेख केला. विशेषतः कस्तुरचंद पार्कजवळील लँडिंगमुळे रहदारीचा प्रवाह विस्कळीत झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. गडकरी म्हणाले, ही समस्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सदर फ्लायओव्हर लँडिंग चुकीचं झालं आहे. म्हणूनच आम्ही ३४ कोटींचा दुरुस्ती प्रस्ताव पाठवला आहे.या चुकीमुळे सध्या संविधान चौक ते एलआयसी चौक हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.

राहुल गांधींवर टीका
कँप्टीकडे जाणाऱ्या वाहनांना सदर भागातील अरुंद आणि बिनयोजित गल्ल्यांतून वळवण्यात येत आहे. हे बदल गर्दीच्या वेळात मोठ्या वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. याच समस्येवर २०२२ मध्ये योगतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रविण डबली यांनी ऑनलाईन अपील केली होती. त्यावेळी गडकरींनी दुरुस्तीस आश्वासन दिलं होतं, परंतु प्रत्यक्ष कृती दिसली नव्हती. आता त्यांच्या नव्या विधानामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण त्या आशेला अजूनही काँक्रीट हवी आहे, केवळ घोषणा नव्हे, असं मत नागरिक व्यक्त करत आहे. गडकरींच्या पत्रकार परिषदेचा दुसरा भाग राजकीय रंगाने भरलेला होता.
राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. तसेच, भाजपने ११ वर्षांत खोटं स्वप्न विकल्याचं विधान केलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना गडकरी म्हणाले, राहुल गांधींना त्यांच्या पक्षातलेच लोक गंभीर घेत नाही. मग जनता का घ्यावी? ते पुढे म्हणाले, आम्ही स्वप्न विकत नाही. जे काही केलं आहे, ते आकडेवारीसह जनतेसमोर ठेवलं आहे.गडकरी यांनी सांगितलं की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. देशात पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास झाला आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न आम्ही पूर्ण करू, असं ठामपणे सांगतानाच त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Yashomati Thakur : राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊ
काँग्रेस ६० वर्षांत जे करू शकली नाही, ते आम्ही ११ वर्षांत केलं. आमचं काम केवळ दृश्यमान नाही, तर विक्रमी आहे, असं गडकरींनी ठणकावून सांगितलं.