
महाराष्ट्रात वक्फ विधेयकावरून खळबळ उडाली आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ जमीन घोटाळ्यात विरोधी पक्षनेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वक्फ बोर्ड विधेयकावरून जोरदार गदारोळ माजला आहे. एकीकडे काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला असताना, दुसरीकडे सत्ताधारी पक्ष त्याचे समर्थन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे, जो काँग्रेससाठी धक्कादायक ठरू शकतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की वक्फ भूखंड घोटाळ्यातील बड्या काँग्रेस नेत्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल.
फडणवीसांनी सांगितले की, 2000 ते 2014 या वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वक्फ जमिनींचा घोटाळा झाला आणि त्यामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, या गैरव्यवहाराबाबत न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीने काँग्रेस नेत्यांनी वक्फची जमीन बळकावल्याचा अहवाल सादर केला होता.

Maharashtra Navnirman Sena : मराठीच्या नावाखाली मर्यादा भंगल्या
कारवाईचा इशारा
अहवाल सरकारच्या हाती आल्याने आता संबंधित नेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना जेव्हा या नेत्यांची नावे विचारली गेली तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, मला नेमकी नावे आठवत नाहीत, पण त्यात अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरून विरोधक सरकारवर हिंदू-मुस्लिम राजकारण खेळत असल्याचा आरोप करत असले, तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
वक्फ विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. हा कायदा पूर्णतः घटनात्मक आणि समाजाच्या हितासाठी आहे, असं फडणवीसांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जर कोणतीही मालमत्ता अल्लाहच्या नावावर असेल, तर तिचा वापर पारदर्शक पद्धतीने आणि समाजाच्या हितासाठी केला गेला पाहिजे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. वक्फ दुरुस्ती विधेयकाला भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने पाठिंबा दिला आहे.
Harshwardhan Sapkal : कोकाटेंच्या सत्तेचा माज शेतकरीच उतरवणार
मुस्लिम समाज आक्रमक
विरोधकांनी मात्र या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेस आणि एमआयएमच्या खासदारांनी हे विधेयक घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मुस्लिम संघटनाही या विधेयकाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे प्रकरण भविष्यात अधिक तापण्याची शक्यता आहे.
वक्फ भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांवर संभाव्य कारवाई आणि वक्फ विधेयकावर वाद सुरू आहे. हा वाद पाहता महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठे वादळ येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस नेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्याने काँग्रेसमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेक्सकडुन यावर काय आक्रमक पवित्रा घेण्यात येईल हे येणाऱ्या काळातच दिसून येईल.