
अकोल्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात यशस्वी कामगिरी बजावलेले अर्चित चांडक आता अकोल्यात कायद्याचा ठाम आणि पारदर्शक आवाज बनतील, अशी अपेक्षा आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी सुरू झाली आहे. या गोवंश तस्करीला पोलीस विभागाची छुपी साथ आहे. गोवंश तस्करी करणाऱ्यांशी पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांनी हात मिळवणी केली आहे. या तस्करीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील काही अधिकारी सहभागी असल्याची चर्चा पोलीस विभागातच आहे. पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये एका विशिष्ट टीमचे वर्चस्व आहे. या सगळ्या टीमच्या नावांमध्ये समानता आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी गोवंश तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता पोलीस विभागामधील अन्य कर्मचारी करत आहेत.
गोवंश तस्करी केव्हा करायची आणि कशी करायची, नाकाबंदी केव्हा नसते, कोणत्या रस्त्यावर नाकाबंदी आहे, त्यामुळे कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. याची माहिती काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून आधीच दिली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अकोल्यामध्ये गोवंश तस्करांचे रस्ते क्लिअर झाले आहेत. या तस्करीच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सध्या सुरू आहे. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांना ही कल्पना आहे की नाही, याबद्दल कोणतीही ठाम माहिती नाही. निरीक्षक शेळके यांना कल्पना नसेल तर पोलीस कर्मचाऱ्यांची ही टोळी शंकर शेळके आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या डोळ्यात धुळफेक करीत होती, असेच म्हणावे लागेल.

मोठे आव्हान
बच्चन सिंह यांच्यानंतर आता अर्चित चांडक हे अकोल्याचे पोलीस अधीक्षक झाले आहेत. नवीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यापर्यंत या गौ तस्करीची माहिती पोहोचली आहे. याशिवाय अकोल्यात रुजू होण्यापूर्वी चांडक यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. कोण अधिकारी आणि कर्मचारी कसा आहे, किती वर्षांपासून तो एकाच ठिकाणी ठाण मांडून आहे, याची माहिती देखील अर्चित चांडक यांनी घेतली आहे. त्यामुळे रुजू झाल्यानंतर अर्चित चांडक यांना स्थानिक गुन्हे शाखेमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मक्तेदारी मोडण्याचे मोठे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. असे न झाल्यास एका विशिष्ट समूहातील कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कमाई करतील. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी होईल, अशी भीती आता व्यक्त करण्यात आली आहे.
अकोल्यामध्ये जी. श्रीधर पोलीस अधीक्षक असताना अख्या पोलीस दलाचे माफिया आणि गुन्हेगारांशी संबंध होते. लोकांनी गुन्हेगारांबद्दल आणि समाजकंटकांबद्दल माहिती करण्यासाठी फोन केल्यानंतर काही क्षणातच संबंधित पोलीस स्टेशन मधून गुन्हेगारांना फोन जायचा. “पोलिसांचा डब्बा निघाला आहे तुम्ही गायब व्हा”, असे गुन्हेगारांना सांगितले जायचे. फोन कोणी केला त्यांची माहिती आणि नंबर देखील गुन्हेगारांना दिली जायची. याचा त्रास अकोल्यातील सामान्य नागरिकांना व्हायचा. त्यामुळे जी श्रीधर यांच्या कार्यकाळामध्ये अकोल्याच्या पोलीस दलाची घडीत चांगलीच विस्कटली. त्याचा मोठा फटका जी. श्रीधर यांच्यानंतर आलेल्या पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना पडला.
IPS Transfer : सीएमच्या गावात डंका गाजविणारे चांडक सांभाळणार अकोला
बदलीचा कट
संदीप घुगे यांच्या काळामध्ये अकोला शहरात प्रचंड मोठी दंगल घडली यामध्ये एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. माफिया आणि गुन्हेगारांची हात मिळवणी केलेल्या अधिकाऱ्यांनी संदीप घुगे यांना श्वास घेण्याचीही फुरसत दिली नाही. मात्र ही बाब घुगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काही अधिकाऱ्यांची उचल बांगडी केली. मात्र संदीप घुगे यांची अल्पवधीतच अकोल्यातून बदली झाली. त्यानंतर बच्चन सिंह हे अकोल्याचे पोलीस अधीक्षक झाले. बच्चन सिंह यांच्याही लक्षामध्ये ही बाब आली. काही अधिकारी आणि कर्मचारी जगलरी अर्थात धूर्तपणा करत असल्याचे बच्चन सिंह यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली.
खाकी घालून कमाईच्या नादाला लागलेल्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फटका बसायला लागला. परिणामी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बच्चन सिंह यांच्या बदलीसाठी प्रयत्नही सुरू केले. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. अशातच आता बच्चन सिंह यांची अकोल्यातून बदली झाली आहे. त्यांच्यानंतर अर्चित चांडक नावाचे तरुण आणि तडफदार अधिकारी आले आहेत. अर्चित चांडक यांनी नागपूरच्या पोलीस दलामध्ये बऱ्यापैकी डंका गाजवला. नागपूर मधील काही पोलीस उपायुक्तांचे नाव त्यांच्या कामगिरीसाठी आदराने घेतले जाते. या पोलीस उपायुक्तांपैकी अर्चित चांडक हे एक आहेत.
वाहतूक संकट
मागील अनेक वर्षांपासून नागपूर शहरातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली होती. वाहतूक व्यवस्था सोडविण्याच्या या गंभीर समस्येवर अर्चित चांडक यांनी यशस्वी तोडगा काढला. चांडक स्वतःही फिल्डवर उतरले आणि सोबतच्या अधिकाऱ्यांना देखील फिल्डवर उतरवले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊ लागली. चांडक यांनी अनेक ठिकाणी वन वे आणि काही वेळासाठी वाहतुकीला वळविण्याचे काम केले. हे काम त्यांनी एका भागापुरताच केले नाही तर नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रयोग राबविले.
नागपूर हे गेल्या काही वर्षांपासून देशाचे सत्ता केंद्र बनले आहे. त्यामुळे नागपुरात व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी नेत्यांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यातील अनेक नेत्यांना झेड प्लस आणि त्याच्यावरची सुरक्षा आहे. त्यामुळे नेत्यांचे दौरे असताना वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असतात. अशा परिस्थितीतही आहे त्या मनुष्यबळामध्ये अर्चित चांडक यांनी नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करून दाखविले. नागपुरातील आपली कारकीर्द यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या चांडक यांच्यावर आता अकोल्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून अकोला पुन्हा दंगलींचे गाव म्हणून नावारूपास येत आहे. अकोल्यातील पोलीस विभागावर यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
स्थानिकांना सर्व ठाऊक
तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उचलला होता. त्यानंतर आणखी एका आमदारांनीही पोलीस विभागाची तक्रार थेट गृहमंत्र्यांकडे केली होती. अलीकडेच अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी देखील पोलीस विभागावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र या सगळ्यांमागे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले अधिकारी आणि कर्मचारी आहेत, हे विसरता येणार नाही. आयपीएस अधिकारी, डीवायएसपी हे काही वर्षांसाठी एखाद्या गावात येतात आणि बदलीनंतर निघून जातात. परंतु स्थानिक लेवलचे कर्मचारी त्याच जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष कार्यरत असतात. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणती गोटी कुठे फिट करायची हे चांगलेच ठाऊक असते.
एखाद्या अधिकाऱ्याला हिरो ठरवायचे की विलन याची फिल्डिंग सामूहिकपणे लावली जाते. आता या सगळ्या फिल्डिंगमध्ये आपल्या कर्तबदारीचे शिक्षण मारण्याचे आव्हान अर्चित चांडक यांच्यावर आहे. अकोल्यातील पोलिस दलाला शिस्त लावण्या सोबतच शहरातील वाहतूक व्यवस्था नीट करण्याचे काम देखील ते करणार आहेत. याशिवाय पुन्हा संवेदनशील म्हणून नावलौकिक येत असलेल्या अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देखील ते काम करणार आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात साजिद खान पठाण हे आमदार आहेत, तर उर्वरित जिल्ह्यामध्ये सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत.
शिस्त लावणार
गेल्या काही काळापासून अकोल्यामध्ये हिंदू विरुद्ध गैरहिंदू, चे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जातीय तणावांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जातीय तणावाला खत पाणी घालणाऱ्या अशा सर्व समाजकंटकांना वेळीच खाकीचा धाक दाखविण्याचे कसबही अर्चित चांडक यांना लागणार आहे. नागपूर प्रमाणे अकोला शहरातही त्यांना आपल्या नावाचा डंका गाजवावा लागणार आहे. आर्चित चांडक नावाची व्यक्ती काय आहे हे माहीत असलेल्या अनेकांना त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. या अपेक्षा अकोल्याचे पोलीस अधीक्षक म्हणून ते नक्कीच पूर्ण करतील या शंका नाही. त्यामुळे आरची चांडक यांच्या कार्यकाळापासून अकोल्यातील पोलीस दलामध्ये सकारात्मक बदल दिसतील यात शंका नाही.