
शहरी स्मार्ट क्लासरूमच्या गोंगाटात ग्रामीण महाराष्ट्राची शाळा हरवली आहे. आठ हजारहून अधिक गावे आजही शिक्षणाच्या पहिल्या पायरीपासूनही दूर आहेत.
शहरांमध्ये डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स आणि तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम यांची चर्चा रंगताना ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षण पायाभूत सुविधांवरचा पडदा मात्र उघड झाला आहे. राज्यातील तब्बल आठ हजार 213 गावे अशी आहेत जिथे अजूनही एकही शाळा नाही. यापैकी एक हजार 650 गावे प्राथमिक शाळेपासून वंचित असून सहा हजार 563 गावे उच्च प्राथमिक शाळांपासून दूर आहेत.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संधींचं दार उघडणारी पहिली पायरी. हीच पायरी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या पायाखालून सरकत आहे, अशी गंभीर टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. गेल्या एका वर्षात 12 लाख 32 हजार 938 विद्यार्थ्यांची घट झालेली आहे. ही आकडेवारीच आजच्या व्यवस्थेच्या अपयशावर मोठा शिक्का मारते. ठाकूर यांनी या घटनेला ‘शिक्षण प्रणालीतील गळती’ ठरवत ती अत्यंत गंभीर बाब असल्याचं नमूद केलं.

परिवर्तनाची गरज
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख यांचं स्वप्नच शिक्षणद्वारे समाज परिवर्तनाचं होतं. पण आज शिक्षणच वंचित आहे, तर परिवर्तन कुठून होणार? असा सवाल करत त्यांनी शासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शालेय समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद करणे सुरू असतानाच, नवीन शाळा सुरू करायचं नियोजनच नसल्याचं वास्तव या आकडेवारीतून समोर आलं आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये मुलांच्या शिक्षणाची गळती लक्षणीय आहे.
ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचं लक्ष वेधत स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सध्याच्या आकड्यांमध्येच भविष्यातील अंधार दडलेला आहे. तातडीने कारवाई झाली नाही, तर ही संख्या फक्त आकड्यातच राहील, त्यामागचं आयुष्य कुणीच मोजणार नाही. त्यांनी पुढे सांगितलं की, ही संख्या केवळ शाळांची नाही, ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची आहे. यासोबतच त्यांनी प्रशासनाला तातडीने नियोजनात्मक उपाययोजना करण्याचं आवाहन केलं. राज्याच्या विकासाचे खरे मोजमाप, रस्ते, पूल किंवा वायफाय नव्हे, तर प्रत्येक पाड्यावरची एक चांगली शाळा हेच असायला हवं, असा रोखठोक संदेशही त्यांनी दिला.
आजही शिक्षणासाठी मैलोनमैल चालत जाणारे विद्यार्थी, अंगणवाडीत बसून पहिली शिकणारी मोठी मुले, आणि एका शिक्षकावर चालणाऱ्या तीन वर्गांची शाळा, हेच खरे चित्र आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांतील. आकडे स्पष्ट करतात, आवाज यशोमती ठाकूरांचा आहे, पण यातून उठणारा प्रश्न संपूर्ण समाजाच्या भविष्यासंदर्भात आहे. ‘आपण किती सुशिक्षित आहोत, हे केवळ पदव्या नव्हे, तर इतरांच्या शिक्षणासाठी आपण काय करत आहोत, यावर ठरतं.’