महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : मराठीच्या पाठीवर हिंदीचा कट्यार 

Congress : मातृभाषेच्या मशालीतून पेटला विरोधाचा वणवा 

Author

भाजप सरकारच्या हिंदी सक्ती धोरणावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल करत मराठी भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. हे केवळ भाषेचे नव्हे, तर अस्तित्वाचे युद्ध आहे,, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. 

मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची भाषा संपवून, संस्कृतीच्या मुळावर घाव घालण्याचा भाजपाचा डावच उघड झाला आहे. आता ही फक्त भाषेची लढाई नाही, ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे, असा ठिणग्यांचाच एल्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या हालचालींविरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवला आहे. केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘हिंदू, हिंदी, हिंदुस्थान’ हाच अजेंडा अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट ‘मराठी संपवण्याचा’ कट उघड केला.

फडणवीसांवर हल्लाबोल 

17 जून रोजी सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयामध्ये हिंदी सक्ती नाही, असे जरी सांगितले जात असले, तरी त्यामध्ये फक्त शब्दांचा खेळ आहे. मूळ आशय व उद्देश तोच आहे, हिंदीची सक्ती. सपकाळ म्हणाले, केवळ शब्द बदलून लोकांना मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी ही केवळ भाषा नाही, ती आमची ओळख, संस्कृती, आणि स्वाभिमान आहे. भाजपाशासित गुजरातसारख्या राज्यांमध्ये पहिल्यापासून हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच ती का लादली जातेय? असा थेट सवाल करत सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीसांनी मोदींना विचारावे की त्यांच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, तर ती मराठी महाराष्ट्रात का?

भडकले सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली, ती मातृभाषेवर आधारित होती. पण भाजपाचे हिंदुराष्ट्र हे मातृभाषा दाबणाऱ्या राजकीय अजेंडावर उभे आहे. हे दोन विचार एकत्र येऊ शकत नाहीत. काँग्रेस हिंदवी स्वराज्याबरोबर आहे, म्हणून हिंदी सक्तीचा कडेलोट करणार, असे सपकाळ ठामपणे म्हणाले. केवळ भाषेपुरतेच नव्हे, तर काँग्रेसने भाजपाच्या गुन्हेगारी व माफिया हातमिळवणीवरही थेट घणाघात केला. नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांच्या सलीम कुत्ताशी असलेल्या कथित संबंधांवरून सपकाळ भडकले. या बडगुजरवर दाऊद इब्राहिमच्या हस्तक सलीम कुत्ताशी संबंध आहेत, अशी माहिती फडणवीसांनीच विधानसभेत दिली होती. मग त्यांनाच आता भाजपात घेताना फडणवीसांची भाषा बदलली कशी?

रस्त्यावर उतरणार

सपकाळांनी पुन्हा एकदा भाजपाचा विसरलेला इतिहास आठवून दिला. एकीकडे इक्बाल मिर्चीशी संबंधित पक्षाला सत्तेत घेऊन त्याच्यावर गुलाबपाणी उधळले, आता कुत्ताशी सोयरिक केली. म्हणजे आता फक्त दाऊद इब्राहिमचाच प्रवेश बाकी आहे. या सर्व घडामोडीमुळे राज्यात ‘मराठी विरुद्ध सक्तीची हिंदी’ असा संघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही. मातृभाषेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तर काँग्रेस मागे हटणार नाही.

ही केवळ भाषिक धोरणाची चर्चा नसून ती एका संस्कृतीच्या जगण्याची लढाई आहे. शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली मातृभाषेवर अन्याय करणे म्हणजे एका संपूर्ण पिढीच्या आत्मसन्मानावर घाला घालणे होय. हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा राज्याच्या राजकारणात निश्चितच मोठा भूकंप होईल, हे आता स्पष्ट झालं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!