
अमरावतीतील शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल राणे यांनी शेतजमिनीवरील अतिक्रमण व मानसिक त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमरावती शहरात गुरुवारी सकाळी घडलेली एक घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली. राठीनगर भागातील रहिवासी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल बाबासाहेब राणे (वय 55) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपाळ राणे हे गुरुवारी सकाळी त्यांच्या पत्नीबरोबर मॉर्निंग वॉकला गेले होते. परत आल्यानंतर ‘मी मागच्या खोलीत थोडं लिहायला बसतो,’ असे सांगून त्यांनी स्वतःला खोलीत बंद केले. लेखनाचा त्यांना छंद होता. त्यामुळे पत्नीला काही शंका आली नाही.
वेळ उलटत गेला आणि खोलीतील शांततेत काही तरी असामान्य होत असल्याची जाणीव झाली. त्यांनी आवाज दिला, पण प्रतिसाद आला नाही.घाबरलेल्या पत्नीने दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या मुलाला आवाज दिला. मुलगा ओमप्रकाशने दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा समोर दिसली काळीज हेलावणारी दृश्य. गोपाल राणे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तातडीने गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि घटनास्थळी सापडलेली चिठ्ठी जप्त केली. त्या चिठ्ठीत गोपाल राणे यांनी स्पष्टपणे आत्महत्येचे कारण मांडले होते.

Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा
न्याय देवतेवर विश्वास
राणे यांनी नमूद केले होते की, फाजलापूर शिवारातील त्यांच्या शेतीवर अतिक्रमण करण्यात आले. याच अतिक्रमणातून सुरू झालेल्या वादाने त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. शिवीगाळ, धमक्या, आणि चार जणांचा सततचा छळ हे सगळं त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामागे कारणीभूत ठरल्याचे त्यांनी लिहिलं.सर्वात भावनिक भाग म्हणजे, चिठ्ठीत त्यांनी लिहिलं की न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेलच. या शब्दांनी गोपाल राणेंची मनस्थिती आणि वेदना स्पष्टपणे समजते.दरम्यान, त्यांच्या मुलगा ओमप्रकाश राणे (वय २३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी स्पष्ट केले की, घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये दिलेल्या चार व्यक्तींच्या नावांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या प्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे, आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाच्या अगोदर राणे यांनी कोणतीही हिंट न देता घरात वावर केला. कविता आणि लेखनाचा छंद असलेले राणे अचानक असा निर्णय घेतील, यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून अस्वस्थता व्यक्त करण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या हातून शेवटचं एक वाक्य लिहिलं मी हरलो नाही, पण थकलोय.
हा प्रकार फक्त एका व्यक्तीचा अंत नसून, एका लढवय्या शेतकऱ्याचा, समाजसेवकाचा, आणि न्यायाच्या आशेवर जगणाऱ्या माणसाचा अस्त आहे.राणे यांच्या आत्महत्येमुळे केवळ त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतजमिनीवरील अतिक्रमण, प्रशासनाकडून दिरंगाई, आणि धमक्यांचा सततचा त्रास या सगळ्यांचा शेवट एक माणूस स्वतःला गमावूनच का करतो?