
देवेंद्रजी योगासने करत नाहीत, पण ते खरे योगी आहेत. रोज ध्यानधारणा करतात, असा खास उल्लेख अमृता फडणवीस यांनी योगदिनानिमित्त केला. योग ही शरीराची नव्हे तर मनाची शिस्त असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योगशिबिरात अमृता फडणवीस यांनी केलेले भाषण, आरोग्य, मानसिक शांतता आणि साधनेच्या महत्त्वावर केंद्रित होते. योग दिवसासाठी एकदाच आसने करणाऱ्यांपेक्षा, रोज योग करणारेच खरे साधक, असे सूचक शब्द त्यांनी उच्चारले. विशेष म्हणजे, आपल्या पतीबद्दल बोलताना त्यांनी दिलखेचक शैलीत म्हटले की, देवेंद्रजी हे योगी आहेत, ते रोज योगाभ्यास करत नाहीत. पण ‘ध्यान’ हा त्यांचा दैनंदिन दिनक्रम आहे. ते शरीरापेक्षा मनाचं संतुलन अधिक जपतात.
अमृता फडणवीस यांनी पुढे नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज जगभरातील नागरिकांनी योगाचा खरा गाभा समजून घेतला आहे. हे केवळ भारतीय संस्कृतीचे वैभव नसून, मानवजातीसाठीच एक अमूल्य देणगी आहे. या भावनेतूनच मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित योगशिबिरात तब्बल एक हजार हून अधिक सफाई कामगारांनी सहभाग घेतला. या कर्मवीरांना योगाचे महत्त्व समजावून देत त्यांना विविध आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवण्यात आली. “हे केवळ एका दिवशी संपणारे नव्हे, तर आम्ही आगामी काळात अनेक प्रशिक्षण सत्रं घेणार आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.

आरोग्याचा अमृतघट
सकाळी योग करणे का लाभदायक असते? याचे उत्तर विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही पातळ्यांवर मिळते. सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांमध्ये असतात व्हायटल फोटॉन्स, जे शरीरातील पेशींना सक्रिय करतात, रक्ताभिसरण वाढवतात आणि मेंदूला ताजेतवाने करतात. हवेत प्राणवायूचे प्रमाण अधिक असते, आणि त्यामुळे प्राणायाम करताना फुफ्फुसांपर्यंत शुद्ध ऑक्सिजन पोहोचतो. एका शांत बागेत, बाल्कनीत किंवा समुद्रकिनारी बसून 10-15 मिनिटांचा प्राणायाम म्हणजे शरीराला मिळणारे सकाळचे प्रथम आहारच! ही क्रिया शरीराला ऊर्जा देते, तणाव दूर करते आणि आत्मा शांत करतो.
शरीरात उमलते ‘सिरोटोनिन’चं फूल
सकाळच्या कोवळ्या उन्हात डोळे बंद करून बसणे ही सवय मन आणि शरीरासाठी अमूल्य आहे. यामुळे त्वचेतून व्हिटॅमिन D तयार होतं, जे हाडं, मेंदू आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी उपयुक्त ठरतं. तसेच, मेंदूमध्ये तयार होणारं सिरोटोनिन हे हॅपी हार्मोन आपल्याला दिवसभर उत्साही ठेवतं. या उपक्रमामधून अमृता फडणवीस यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला, योग करणे म्हणजे केवळ आसने करणे नव्हे, तर स्वतःच्या आत डोकावून पाहणे, तिथल्या शांततेला स्पर्श करणे. योग हा सेल्फ डिव्हलपमेंटचा मार्ग आहे. रोज फक्त 15 मिनिटे स्वतःसाठी काढा… तुमचं जीवनच बदलेल, असे त्या म्हणाल्या.