
नागपूरमध्ये अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला धार्मिक दंगल पुन्हा तापला आहे. राज्यात आषाढी एकादशी वारीवरूनही तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
17 मार्च 2025 हा दिवस नागपूरच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस होता. ज्या शहराने अनेक सामाजिक चळवळी पाहिल्या, त्या शहराने पहिल्यांदाच धर्माच्या नावावरून पेटलेली दंगल अनुभवली. धर्मांतराच्या पार्श्वभूमीवर उफाळलेली ही दंगल इतकी गंभीर होती की, संपूर्ण शहरात संचारबंदी लावण्यात आली. रस्त्यांवर पोलिसांचा फौजफाटा, ओस पडलेली बाजारपेठ, आणि लोकांनी घरात लपून बसलेलं भय हे दृश्य नागपूरने पहिल्यांदाच अनुभवलं. या घटनेनंतरही महाराष्ट्रात धार्मिक राजकारणाचं सावट हटलेलं नाही. उलटपक्षी, औरंगजेबाच्या कबरीवरून उठलेला वाद आता नव्या रूपात पुन्हा समोर येतो आहे.
राज्यात धार्मिक भावना भडकवून राजकीय भांडवल करण्याची नवी परंपरा सध्या जोरात दिसतेय. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेवर घाव घातलाय. नागपूरच्या दंगलीच्या काही दिवस आधी अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून विधान करून वातावरण आधीच तापवलं होतं. त्या वादावर पडदा पडतो न पडतो तोच, त्यांनी आता आषाढी एकादशीच्या पवित्र वारीवर टीका करत, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला आव्हान दिलंय. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र असलेली आषाढी एकादशीची वारी ही केवळ धार्मिक यात्राच नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा कणा आहे.

समुदायांमध्ये अविश्वास वाढ
लाखोंच्या संख्येने पंढरपूरकडे निघालेली ही वारी श्रद्धेची गंगोत्री समजली जाते. मात्र, अबू आझमी यांनी ‘वारीमुळे वाहतूक कोंडी होते’ असे वादग्रस्त विधान करत वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.या विधानानंतर विरोधक आणि नागरिक संतप्त झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा अशांततेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी यावरून असा इशारा दिला आहे की, ‘वरील वक्तव्यांचा परिणाम नागपूरसारखा दंगलमय होऊ शकतो.’ अनेक विरोधी नेत्यांनी आझमींवर टीकेची झोड उठवली आहे. काहींनी तर थेट असा आरोप केला की, धर्माच्या नावावरून जाणीवपूर्वक आग लावण्याचा हा कट आहे.
राजकीय वर्तुळात या विधानाने खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. ‘राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही’ असे स्पष्ट केलं आहे. सामाजिक माध्यमांवरही नागरिकांनी आझमींच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत धर्मांतराच्या घटनांवरून सातत्याने वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत अबू आझमींच्या वादग्रस्त विधानांनी पेटलेल्या परिस्थितीवर तेल ओतण्याचं काम केलं आहे. हिंदू-मुस्लिम समुदायात पुन्हा एकदा अविश्वासाची पेरणी होते आहे का, असा प्रश्न आता गंभीरतेने विचारला जात आहे.
आता नागरिक आणि राजकीय निरीक्षक विचारू लागले आहेत की ‘धर्माच्या नावावरून सतत वाद निर्माण करणं हे काही नेत्यांचं राजकारण टिकवण्याचं साधन बनतंय का?’ या प्रश्नांचं उत्तर राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.राज्यात धार्मिक सलोखा हा केवळ घोषवाक्य राहू नये, तर कृतीतून दिसायला हवा. अन्यथा, एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखे धर्म आणि राजकारण एकत्र आले, की समाज विघटनाच्या कडेवर पोहोचतो हे नागपूरने नुकतेच अनुभवले आहे.
Pyare Khan : महाराष्ट्र पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी तयार?