महाराष्ट्र

Abu Azmi : वारीवर शब्दांनी पेटवली आग, आता माफीचा मेघ

Ashadhi Ekadashi : अबू आझमी यांनी केली दिलगिरी व्यक्त

Author

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या आषाढी वारीबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांवर आघात केल्याचा आरोप होताच राज्यभरातून आझमींवर तिखट शब्दांत टीका झाली. संतप्त वारकरी संप्रदायाच्या रोषाच्या पार्श्वभूमीवर अखेर अबू आझमींनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत सार्वजनिक ‘माफी’चा मार्ग पत्करला आहे.

अबू आझमी यांनी आपली बाजू स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी नमूद केलं की, मी वारीचा उल्लेख मुस्लिम समाजावरील भेदभावाच्या पार्श्वभूमीवर केला होता. ही कुठलीही तुलना नव्हती. जर माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी ते शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. आझमींनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, मी एक समाजवादी विचारसरणीचा नेता आहे. सर्व धर्म, संस्कृती आणि संत परंपरेबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आहे. वारकरी परंपरेचा मी सन्मान करतो. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा भाग आहे.

Anil Deshmukh : ‘योग्य वेळे’चं नाटक पुरे आता निर्णय घ्या

कशामुळे पेटला वाद

सोलापूरमधील पत्रकार परिषदेमध्ये अबू आझमी यांनी वारी संदर्भात बोलताना नमूद केलं होतं की, वारीमुळे रस्ते बंद होतात, पण आम्ही कधीही तक्रार केली नाही. मात्र जेव्हा मशिदीत जागा कमी पडते आणि काही लोक रस्त्यावर नमाज अदा करतात, तेव्हा त्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला जातो. ही मुस्लिम समुदायावरील अन्यायाची स्पष्ट उदाहरणं आहेत. या विधानानंतर आझमींवर समाजमाध्यमांतून आणि राजकीय वर्तुळातून जोरदार टीका झाली. अनेकांनी वारकरी परंपरेची तुलना मुस्लिम धार्मिक कृतींशी करून त्या परंपरेचा अवमान केल्याचा आरोप लावला.

मी नुकत्याच सोलापूरमध्ये केलेल्या विधानावरून काही गैरसमज पसरले. माझे विधान द्वेषमूलक नव्हते, मात्र जर त्यातून वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे शब्द मागे घेतो. माझा हेतू धार्मिकतेवर नाही तर सरकारच्या दुटप्पी धोरणांवर प्रकाश टाकण्याचा होता. त्यांनी पुढे नमूद केलं की, मी वारीच्या परंपरेचा सन्मान करतो. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपदेचा अभिमानास्पद भाग आहे. माझं विधान कोणत्याही समाजाविरोधात नव्हतं, तर अल्पसंख्याक समाजाच्या मनात भेदभावाची भावना निर्माण होऊ नये यासाठीच आवाज उठवला.

Maharashtra : रहिवासी जमिनीसाठी तुकडेबंदी नियमात मोलाचा बदल

शांततेचं आवाहन, परंपरेचा सन्मान

संपूर्ण वादग्रस्त घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अबू आझमी यांनी दिलगिरी व्यक्त करत, राज्यातील सौहार्द टिकवण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकलं आहे. देशाच्या एकतेला बाधा येणार नाही, मात्र अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा देत राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील महाराष्ट्रात कोणतंही विधान करताना नेत्यांनी अधिक जबाबदारीने बोलणं आवश्यक आहे. अबू आझमी यांचा उद्देश काही वेगळा असला, तरी त्यांचा शब्दफेक अनेकांच्या भावना दुखावणारा ठरला. त्यानंतर त्यांनी माफी मागून परिस्थिती सांभाळली खरी, पण या प्रकरणानंतर सर्वच नेत्यांना ‘विचारपूर्वक वक्तव्य करा’ हा संदेश ठळकपणे गेला, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!