महाराष्ट्र

Amravati : व्यसनाच्या विळख्यातले चेहरे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर 

Police Action : भविष्यातील गुन्हेगारांची कुंडली तयार

Author

तरुणाईला गिळंकृत करणाऱ्या अमली पदार्थांच्या विळख्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांनी थेट हल्ला चढवला आहे. ‘व्यसनांपासून संरक्षण’ आणि ‘गुन्हेगारांवर नियंत्रण’ हे ध्येय ठेवत, पोलिसांनी तस्करांची कुंडलीच तयार केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील गल्ल्यांपासून गलियार्‍यांपर्यंत एक भयावह सावली पसरत आहे, अमली पदार्थांच्या विळख्याची. पालकांनी आपल्या मुलांना दारू-सिगारेटपासून दूर ठेवण्यासाठी लढा दिला. पण आता समोरचं आव्हान अधिक गहिरं, अधिक धोकादायक आहे, अमली पदार्थांचं. ही नशा आता फक्त खाजगी ठिकाणी नाही, तर शाळा, महाविद्यालय, उद्याने, चौक आणि अगदी सार्वजनिक स्थानांपर्यंत पोहोचली आहे. याचा फटका फक्त शरीरापुरता मर्यादित नाही, तर मनाचंही गालबोट लावणारा, आयुष्य उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.

अमली पदार्थांचं जाळं विणणाऱ्या टोळ्यांचं तस्करीचं जाळं अधिकच मजबूत होत चाललं असताना, अमरावती ग्रामीण पोलीस दलाने त्याला सळो की पळो करून सोडण्यासाठी आता थेट ‘गुन्हेगारी भविष्यकुंडली’ तयार करण्याचं अभियान सुरू केलं आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली अमरावती ग्रामीण पोलिसांनी गेल्या काही वर्षांतील अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींचा अभ्यास करून थेट त्यांच्या ‘कुंडल्या’ तयार केल्या आहेत. यामध्ये गेल्या दहा वर्षांतील ५७ संशयित तस्करांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्वांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

कठोर कायदेशीर कारवाई

फक्त कडक कारवाई नाही, तर समुपदेशनाच्या माध्यमातून या व्यक्तींना सुसंवादातून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. पोलीस ठाण्यांमध्ये या व्यक्तींना बोलावून त्यांना व्यसनमुक्त आयुष्याचे महत्त्व समजावले जात आहे. तसेच यापुढे जर कोणी पुन्हा अमली व्यवहारात दिसून आला, तर कठोर कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी स्पष्ट चेतावणीही देण्यात आली आहे. 26 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी जनजागृतीचा मोठा कार्यक्रम राबवला.

शाळा, महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे घेतली गेली. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने युवकांसमोर या व्यसनाचे परिणाम सखोल पद्धतीने मांडण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, युवकांची बाईक रॅली, आणि पोस्टर मोहिमा यामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. पोलीस अधिकारी, शिक्षक, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी विद्यार्थ्यांना ‘नकार द्या व्यसनाला, होकार द्या उज्ज्वल भविष्याला’ हे ब्रीद देत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

Bhandara : ज्ञानाच्या मंदिरात शालार्थ घोटाळ्याची काळी सावली

समाजाचा सहभाग अत्यावश्यक

अमली पदार्थांचे दुष्परिणाम हे केवळ एकट्याच व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजव्यवस्थेवर होतो. कर्जबाजारीपणा, गुन्हेगारी, मानसिक आजार, आत्महत्यांचे प्रमाण, या सगळ्यांशी अमली पदार्थांचा थेट संबंध आहे. त्यामुळे फक्त पोलीस यंत्रणा पुरेशी नाही, समाजालाच आता सजग व्हावं लागेल. प्रत्येक नागरिकाने, विशेषतः युवकांनी, या अमली विळख्याच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. जर कोठेही अशा अवैध व्यापाराची माहिती आढळल्यास ती तत्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!