मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरून केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी त्यांना सडेतोड इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनाने आणि त्यांच्या वक्तव्यांनी हा विषय आणखी पेट घेतला आहे. विशेषतः, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरून केलेल्या कथित शिवीगाळीच्या आरोपाने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या प्रकरणात भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जरांगे पाटलांना चांगलेच खडसावले आहे. त्यांनी जरांगे यांच्या वक्तव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आधार घेत तीव्र विरोध दर्शवला आणि त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे. मात्र, त्यांच्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने वादाला तोंड फोडले.
मनोज जरांगे यांनी सभेत स्पष्टीकरण देताना सांगितले, मी कुणालाही शिवी दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल मी काही बोललो नाही. जर तसे झाले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. कारण आमच्या आई-बहीण देखील कष्ट करतात. त्यांची मुले आत्महत्या करत आहेत. आमच्या आईलाही तुमच्या आईप्रमाणे सन्मान मिळायला हवा. या वक्तव्यातून जरांगे यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर टीका होतच आहे. डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करतात. पण त्यांचे वक्तव्य खालच्या दर्जाचे आहे.
सामाजिक सलोखा धोक्यात
छत्रपती शिवाजी महाराज असते तर अशा वक्तव्य करणाऱ्याची जीभ छाटली असती. डॉ. फुके यांनी जरांगे यांना आंदोलनाचा अधिकार असला तरी कोणत्याही नेत्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल असभ्य टीका करणे अशोभनीय असल्याचे ठणकावले. ते पुढे म्हणाले, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता मनोज जरांगे यांच्या स्तरावर जाऊन उत्तर देण्यास सक्षम आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयमी आहेत. ते अशा टीकेला प्रत्युत्तर देत नाहीत. कारण यामुळे महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. डॉ. फुके यांनी जरांगे यांना सल्ला देताना म्हटले की, त्यांनी आता अशा वक्तव्यांचा अवलंब थांबवावा. अन्यथा भाजप कार्यकर्ते त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील. जरांगे यांनी छत्रपतींच्या नावाने आंदोलन करायचे असेल तर त्यांनी त्यांच्या विचारांचा आदर ठेवावा.
महाराष्ट्राच्या मातीत अशा खालच्या पातळीच्या राजकारणाला स्थान नाही, असे डॉ. फुके यांनी ठणकावले. त्यांनी पुढे सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते नेहमीच संयमाने वागतात आणि समाजात शांतता राखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. या संपूर्ण प्रकरणात डॉ. परिणय फुके यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवर आणि त्यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दाखवला आहे. ते म्हणाले, आम्ही संयम राखतो, पण गरज पडली तर आम्ही उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही. या प्रकरणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला नवे वळण मिळाले असून, येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Nagpur : सण साजरे होणार उत्साहात, कारण पोलीस गुन्हेगारील देणार मात
