बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजप नेते सुरेश धस यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली.
बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेत वादळ निर्माण झाले. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेते सुरेश धस यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक आधीच तणावपूर्ण होती. त्यात सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील विकासकामांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वातावरण तापवले.
शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या वादात मुंडे आणि धस यांनी परस्परांवर जोरदार टीका केली. अजित पवार हे सर्व ऐकत होते; मात्र प्रकरण चिघळण्याआधी त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.
मंत्रालय सुरक्षेचा फज्जा: Minister Narhari Zirwal यांच्या दादागिरीमुळे वादंग
हल्ला अन् प्रतिहल्ला
सुरेश धस यांनी बैठकीत बीड जिल्ह्यात बोगस विकासकामे दाखवून 70 कोटी रुपये उचलल्याचा आरोप केला. यावर अजित पवार यांनी त्यांना “तुमचे म्हणणे लेखी स्वरूपात द्या असे सांगत गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे धस आणि मुंडे यांच्यात वाद पेटला.
धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्याची बदनामी होईल असे बोलू नका. याचा परिणाम सरकारी कार्यालयांवर आणि कामकाजावर होत आहे. त्यावर धस भडकत म्हणाले, तुम्ही माझ्यावर बोट दाखवताय का? मुंडेंनी यावर मी कॉमन बोलतोय, असे उत्तर दिले. मात्र, धस यांनी नाव घेऊन बोला अशी आक्रमक भूमिका घेतली.
अजित पवारांची मध्यस्थी
प्रकरण हाताबाहेर जाण्याआधी अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, कुणाच्याही दबावाखाली काम करण्याची गरज नाही. जर कोणती अडचण आली तर थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा. त्यांनी पोलिसांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील हा वाद बीड जिल्ह्याच्या राजकारणाला नवा मोड देऊ शकतो. भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मुंडेंना नवीन राजकीय ताकद मिळाली आहे, तर धस यांची भूमिका अजूनही आक्रमक राहणार असल्याचे दिसते. आगामी काळात या वादाचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
