
मुघल सम्राट औरंगजेब यांच्याबद्दल दिलेल्या वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना संपूर्ण महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मोठा वाद उसळला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना मुघल सम्राट औरंगजेब यांच्याबद्दल दिलेल्या विधानामुळे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विधानाने सभागृहात खळबळ उडाली आणि भाजपसह इतर पक्षांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला.
विधानसभेत या मुद्द्यावरून आज प्रस्ताव आणण्यात आला, जो बहुमताने संमत करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाची माहिती देताना सांगितले की, अबू आझमी यांच्या विधानामुळे सभागृहाची प्रतिष्ठा दुखावली गेली आहे, त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Chandrashekhar Bawankule : विद्यार्थ्यांचा खर्च आता शून्यावर
भाजपचा आरोप
अबू आझमी यांनी विधानसभेबाहेर पत्रकारांशी बोलताना औरंगजेब यांच्याबद्दल विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, त्याने अनेक मंदिरे बांधली. तसेच, त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा धार्मिक नव्हता, तर तो राज्य प्रशासनावर आधारित होता, असे मत व्यक्त केले.
भाजपसह अनेक पक्षांनी यावर आक्षेप घेतला आणि अबू आझमी यांच्या विधानाची तीव्र शब्दांत निंदा केली. भाजपने असा आरोप केला की, इंडिया ब्लॉकचे काही सदस्य औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनीही यावर कडाडून टीका केली आणि नौपाडा पोलिस ठाण्यात आझमी यांच्याविरुद्ध शून्य एफआयआर दाखल केला, जो नंतर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
Devendra Fadnavis : नेहरूंच्या लिखाणाचा निषेध करण्याची हिंमत आहे का?
आझमींनी घेतला यू-टर्न
वाद वाढत असताना, अबू आझमी यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, ‘माझे शब्द विकृत करून सादर केले गेले आहेत. मी कोणत्याही महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला नाही.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘जर माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द आणि विधान मागे घेतो.’
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी आझमींना पाठिंबा देत विधानसभेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादव म्हणाले, जर निलंबनाचा आधार विचारसरणीवर आधारित होऊ लागला, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हुकूमशाही यात काय फरक राहील?.
महाराष्ट्रात तणाव
त्यांच्या या स्पष्टीकरणाचा काहीही उपयोग झाला नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचे निलंबन कायम ठेवले. यावर आझमींनी निराशा व्यक्त करत म्हटले, मी विधानसभेचे कामकाज चालावे म्हणून माझे विधान मागे घेतले, पण तरीही मला निलंबित करण्यात आले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे
संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने आझमींवर टीका करत म्हटले की, औरंगजेबासारख्या क्रूर मुघल सम्राटाचे समर्थन करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकचे काही सदस्य आझमींच्या समर्थनार्थ उतरले आहेत.