समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकांना नियमित करण्यासाठी नाना पटोले यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा संपूर्ण देशात महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत, त्याच वेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर समग्र शिक्षा अभियानातील शिक्षक आपल्या न्यायहक्कांसाठी लढा देत आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेत या शिक्षकांच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा केला आणि सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
आंदोलनात केवळ समग्र शिक्षा अभियानातील शिक्षकच नाही, तर अंगणवाडी सेविका आणि कंत्राटी शिक्षकदेखील आपले हक्क मागण्यासाठी एकवटले आहेत. आंदोलक शिक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून विधिमंडळाच्या बाहेर उपोषणाला बसले आहे. उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे अनेक महिला शिक्षक बेशुद्ध पडत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना नाना पटोले यांनी सरकारला जबाबदारी घेण्यास सांगितले.
Parinay Fuke : जोपर्यंत निलंबन नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही
अंमलबजावणीची प्रतीक्षा
नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, समग्र शिक्षा अभियानातील काही शिक्षकांना नियमित करण्यात आले असले, तरी अनेक शिक्षक अजूनही कंत्राटी स्वरूपातच कार्यरत आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच या शिक्षकांना नियमित करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, अंगणवाडी सेविकांसाठीही सरकारने काही निर्णय घेतले असले तरी त्याचा अद्याप फायदा मिळालेला नाही. त्यामुळे या आंदोलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे.
नाना पटोले यांनी सरकारला विचारले की, एकाच योजनेतील काही शिक्षकांना नियमित केले जात असेल आणि काहींना नाही, तर हा दुजाभाव कशासाठी? सरकारची भूमिका स्पष्ट असावी आणि कोणालाही अन्याय सहन करावा लागू नये. यासोबतच त्यांनी सरकारला आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची अवस्था पाहून तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नाना पटोले यांच्या प्रश्नांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सर्व शिक्षकांच्या मागण्यांचे बारकाईने परीक्षण केले जाईल. संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच, या आंदोलनाबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून, लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
