
नागपूरच्या मिहान येथे देशातील सर्वात मोठ्या पतंजली फूड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून अन्न प्रक्रिया उद्योगाला नवी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रविवारी, नागपूरमधील मिहान येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य पतंजली फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन झाले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि विशेषतः संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे हा आहे.
समारंभाला पतंजली आयुर्वेदचे सह-संस्थापक योगगुरू रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या फूड पार्कमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून संत्रा आणि इतर फळांचे उत्पादन खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. विशेषतः संत्रा प्रक्रिया प्रकल्पामुळे फळांचे योग्य प्रकारे वर्गीकरण, प्रतवारी, साठवणूक आणि त्याचे विविध उत्पादनांमध्ये रूपांतर होणार आहे.

फडणवीस सरकारचा पुढाकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला एक ऐतिहासिक संधी म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की, हे केवळ संत्रा उत्पादकांसाठी नव्हे, तर संपूर्ण फळ प्रक्रिया उद्योगासाठी महत्त्वाचे केंद्र ठरेल. त्यांनी असेही स्पष्ट केले की, राज्य सरकारने कोणत्याही उद्योगाला जमीन मोफत दिली नाही. नागपूरमध्ये हा प्रकल्प यावा यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि तीन वेळा टेंडर काढल्यानंतरही पतंजलीने सर्वाधिक किंमत देऊन ही जागा मिळवली आहे.
नितीन गडकरी आणि मी जेव्हा बाबा रामदेव यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो, तेव्हा इतर राज्यांनी या प्रकल्पासाठी मोफत जमीन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आम्ही नागपूरमध्येच हा हब उभारण्याचा निर्णय घेतला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विदर्भाच्या क्षेत्राला बळ
मुख्यमंत्र्यांनी यावर भर दिला की, या फूड पार्कमुळे संत्रा शेतकऱ्यांसाठी मोठी क्रांती घडेल. ही सुविधा नुसतीच उत्पादन प्रक्रियेपुरती मर्यादित राहणार नाही, तर यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत चांगला दर मिळेल. संत्र्यांसोबतच इतर फळांचीही प्रक्रिया येथे केली जाईल, ज्यामुळे नासाडी टाळली जाईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला अधिक चांगला वाव मिळेल, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपल्या भाषणात विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल आणि त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देईल.
दूरदृष्टीपूर्ण निर्णय
फडणवीस सरकारने या प्रकल्पासंदर्भात घेतलेले निर्णय हे दूरदृष्टीचे होते. टेंडर प्रक्रिया पारदर्शक ठेवत, कोणालाही विशेष सवलत न देता सरकारने हा प्रकल्प नागपूरमध्येच राहील याची काळजी घेतली. भविष्यात या केंद्राचा आणखी विस्तार केला जाणार आहे. सरकार यासाठी कायम पाठिंबा देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र सरकार केवळ फूड पार्कसाठीच नव्हे, तर संपूर्ण अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सातत्याने पाठिंबा देईल. भविष्यात आणखी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे फडणवीस यांनी सांगितले.