
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी हे विधेयक मुस्लिमांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आहे.
केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जोरदार टीका करत हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे नाही. त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठीचा डाव असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी रात्री उशिरा हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. अबू आझमी यांनी केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
आझमी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मुस्लिम समुदायाच्या हितासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. उलट त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांवर वारंवार आघात होत आहेत. मशिदींच्या जागेबाबत सतत वाद निर्माण केले जात आहेत. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींवर लक्ष ठेवून त्या बळकावण्याचा सरकारचा हेतू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मुस्लिम हितांविरोधात निर्णय
वक्फ बोर्डाच्या जमिनी मुस्लिम समाजाने धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कल्याणासाठी दान केलेल्या आहेत. मात्र, सरकार त्या जमिनींवर मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे अबू आझमी यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की, केंद्र सरकार वक्फ जमिनींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे विधेयक आणत आहे. यामुळे मुस्लिम संस्थांना मोठे नुकसान होईल आणि त्यांच्या धार्मिक स्वायत्ततेवर घाला घातला जाईल.
Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मुस्लिम समुदायाच्या हक्कांवर सातत्याने गदा येत आहे. मशिदींविषयी नवनवीन वाद निर्माण करून मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा पाळण्यापासून रोखले जात आहे. नमाज पठणास अडथळे आणले जात आहेत. वक्फ संपत्तीवरील नियंत्रणासाठी सरकार आक्रमक भूमिका घेत आहे, असे अबू आझमी यांचे मत आहे.
तीव्र विरोध
वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात अनेक विरोधी पक्ष एकवटले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या विधेयकावर आक्षेप नोंदवत सरकारवर टीका केली. मुस्लिमांच्या जमिनींवर दावा सांगून त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अबू आझमी यांनी स्पष्ट केले की, मुस्लिमांच्या हक्कांसाठी ते लढत राहतील आणि या विधेयकाला कट्टर विरोध करत राहतील. सरकारच्या या धोरणांमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे व विरोधक सरकारविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे.