महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील वादाचा कॉल व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्याचा नवीन अंक रंगतोय. यावेळी केंद्रस्थानी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढोल वाजत असताना, मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आगीसारखा पेटलाय. यातच अजितदादांच्या थेट आणि बिनधास्त बोलण्याच्या शैलीने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधले. पण यावेळी हा रंग त्यांच्यासाठीच डोकेदुखी ठरलाय. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाच्या कारवाईदरम्यान घडलेल्या नाट्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरूम खणण्याच्या तक्रारींवर कारवाईसाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा धडाडीने पोहोचल्या. पण तिथल्या ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली. याचवेळी एका शेतकऱ्याने थेट अजित पवारांना फोन लावला आणि त्यांचा संवाद अंजना कृष्णा यांच्याशी करून दिला. हा फोनवरील संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्याने राजकीय वातावरणात आग लागली. व्हिडीओत अजितदादांचा रुबाबदार आवाज ऐकू येतो, ‘तुमची इतकी हिंमत, मला ओळखलं नाही?’ त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरू झाल्या.
Parinay Fuke : ओबीसी समाजाच्या संघर्षात शांती दूत ठरले भाजप आमदार
अंजना कृष्णाची निर्भीकता
अखेर मंगळवारी (9 सप्टेंबर 2025) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिल्यांदा लक्ष घातले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणाचा पूर्ण अहवाल माझ्याकडे यायचा आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मागवला आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी अजितदादांचेही समर्थन केले. खूपदा निवेदनं येतात, त्यावर आम्ही कारवाईचे आदेश देतो. पण निवेदनातली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात तफावत असते, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी पुढे सांगितले, अधिकारी आम्हाला खरी परिस्थिती समजावतात.
निवेदनात सांगितलेली गोष्ट आणि प्रत्यक्षातले चित्र वेगळे असते. त्यानुसारच कारवाई होत असते. अजित पवारांनीही याप्रकरणी स्वतःचा खुलासा केलाय. त्यांनी आपण फक्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून कारवाईसाठी सांगितले होते, असे स्पष्ट केले. मी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितलाय. सध्या एवढंच पुरेसं आहे, असं म्हणत त्यांनी या वादावर शांततेचा मंत्र फिरवला.हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर जणू आगीसारखा पसरला. अजितदादांच्या रुबाबदार शैलीने एकीकडे त्यांच्या समर्थकांना भुरळ घातली. तर दुसरीकडे विरोधकांना टीकेचे नवे हत्यार मिळाले. अंजना कृष्णा यांनी मात्र आपले कर्तव्य बजावताना कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या निर्भय वृत्तीचेही कौतुक होत आहे. पण या सगळ्या नाट्यात अजितदादांचा ‘तुम्ही मला ओळखलं नाही’ हा डायलॉग आता सोशल मीडियावर गाजतोय.
