अकोल्यातील विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर, अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आक्रमक आणि सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले आमदार अमोल मिटकरी यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीची टर्म लवकरच संपत आहे. यामुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या जागेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच अमोल मिटकरी यांची टर्म यांची टर्म रिपीट करायची नाही असा निर्णय घेतला आहे. या संदर्भामध्ये नागपूर दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे स्पष्ट संकेत द लोकहित लाइव्हला दिले होते.
अमोल मिटकरी यांच्या जागेसाठी आता नव्या नावांची चाचपणी सुरू आहे. यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची होत आहेत. अमोल मिटकरी यांची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामध्ये आहे. ती मिळवण्यासाठी भाजपचा एक नेता सध्या प्रयत्नशील आहे. जर अमोल मिटकरी यांच्या जागेवर भाजपच्या या नेत्याची वर्णी लागली नाही, तर विधान परिषदेचे भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या जागेवर आपल्याला पाठवण्यात यावे किंवा राज्यपाल नामित जे आमदार असतात यासाठीही हा नेता प्रयत्नशील आहे.मात्र या नेत्याला पक्षांतर्गत आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून फारसा पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे.
RSS : पारंपरिक शेती आणि देशी गोवंशातून आत्मनिर्भरतेचा नवा आराखडा
नवे चेहरे, नवी खेळी
भाजपच्या या नेत्याच्या तक्रारी थेट दिल्ली पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. तरीही, प्रदेश पातळीवर या नेत्याचे लाड पुरविले जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही नेत्याने अमोल मिटकरी यांच्या जागेसाठी ठाम दावा केलेला नाही. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते विजय देशमुख यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, या मतरदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे गोपीकिशन बाजोरिया यांनीही या जागेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा शिवसेनेसाठी सोडावी, अशी मागणी होत आहे.
परंतु गोपीकिशन बाजोरिया यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच अकोल्यात त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. ज्यात त्यांचा पुतळाही जाळण्यात आला. हा विषय थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गोपीकिशन बाजोरिया यांचे नाव पुढे येणे कठीण दिसत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे विधान परिषदेची जागा कोण मिळवणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमोल मिटकरी यांच्या टर्मनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार की शिवसेनेकडे जाणार, की आणखी कोणता नेता बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकीय रणधुमाळीत नवे चेहरे आणि नव्या खेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, ही जागा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकते, असे चित्र आहे.
