महाराष्ट्र

Amaravati : महापालिकेची तिजोरी रिकामी अन् कामांना ब्रेक

Vidarbha : अमरावतीच्या विकासात निधीचा अडसर

Author

अमरावती महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्यामुळे शहरातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. निधीअभावी रस्ते, नाले, उद्याने आणि इतर कामे ठप्प झाली आहेत.

अमरावती शहराचा विकास खाचखळग्यांत अडकलेला आहे. कारण, महापालिकेच्या तिजोरीत उत्पन्नाचे स्रोत अत्यंत मर्यादित आहेत. शासनाकडून येणारा निधीही अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. परिणामी, शहरातील महत्त्वाची विकास कामे ठप्प असून नागरी सुविधा बिघडलेल्या स्थितीत आहेत.

नवे सिमेंट काँक्रीट रस्ते, नाल्यांची कामे, उद्यानांचा विकास, सौंदर्यीकरण, डांबरी रस्त्यांची डागडुजी ही सर्व कामे रखडलेली आहेत. अनेक भागांतील नागरी समस्या वर्षानुवर्षे जशाच्या तशा राहिल्या आहेत. सध्या महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मर्यादेमुळे खर्च करतानाही हात राखूनच पावले टाकावी लागत आहेत.

संकटात महापालिकेचा अर्थसंकल्प

महापालिकेने 2025 – 26 आर्थिक वर्षासाठी तयार केलेला अर्थसंकल्प खूपच मर्यादित आणि कमी रकमेचा आहे. उत्पन्न अपुरं, शासनाकडून निधी नाही. त्यामुळे विकासकामे सुरू करायची तरी कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले की, तोपर्यंत कोणतेही नवीन काम हाती घेतले जाणार नाही. जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही. फक्त आधी सुरू असलेले प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

Nagpur  : काँग्रेसच्या डोक्यावर मोटाभाईंचा तुफान धुमाकूळ 

सध्या महापालिकेच्या आर्थिक अडचणीमुळे कंत्राटदारांची देयके थकीत आहेत. इतकेच नव्हे तर, कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर देता येत नाही. त्यामुळे जे थोडेफार पैसे उपलब्ध आहेत, त्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर केला जात आहे. शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचते कारण तिथे नालेच नाहीत. नाल्यांचे व गटारांचे काम पूर्ण करायचे असेल तर त्यासाठीही महापालिकेकडे पुरेसा निधी नाही.

गटातील कामांवर भर

नवे विकासकाम सुरू करायचे झाले तर निविदा प्रक्रिया राबवावी लागते. निविदा निघाल्यावर जे कंत्राटदार काम घेतात, त्यांना वेळेत पैसे देणे आवश्यक असते. मात्र, उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्यामुळे मनपा ही आर्थिक गणित सांभाळताना अडचणीत सापडते. डीपीसीकडून निधी मिळतो किंवा शासन काही निधी पाठवते, तेव्हाच काही हालचाल होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Amit Shah : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवासची भर

महापालिकेने या परिस्थितीत यंदा कोणताही नवीन मोठा प्रकल्प हाती घेतलेला नाही. जी कामे अत्यावश्यक आणि प्राधान्याची आहेत, तीच कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. निधी आणि उत्पन्न मर्यादित असल्यामुळे गरजेनुसार प्राथमिकता ठरवून त्याप्रमाणेच खर्च केला जात आहे. अमरावती शहराचा विकास आता निधीच्या मार्गावर अडकलेला आहे. प्रशासनाच्या नियोजनामुळे थोड्याफार प्रमाणात सेवा सुरू असल्या तरी दीर्घकालीन विकासाची गती पुन्हा मिळवण्यासाठी तातडीने निधीची आवश्यकता आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!