
अमरावती शहरात जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर रस्त्यात शस्त्रास्त्रे वापरून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
अमरावती शहरात शनिवारी (28 जून रोजी) सायंकाळी घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांवरच काळाने घाला घातला. वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा कलाम हे आपल्या दुचाकीवरून जात होते. अचानक एक चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्याच क्षणी वाहनातून उतरलेले पाच ते सहा हल्लेखोर कलाम यांच्यावर जीवघेणे हल्ले करतात.
धारदार शस्त्राने छाती आणि पोटावर सपासप वार करत आरोपींनी त्यांचा जागीच खून केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कलाम यांना तत्काळ जवळच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही घटना उघड होताच अमरावती पोलिस आयुक्त अरविंद चावरिया स्वतः घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शहरात तातडीने दोन विशेष पथके रवाना करून सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांची माहिती आणि वाहनांची कसून तपासणी यावर विशेष भर दिला जात आहे.

Ravi Rana : मराठी अस्मितेचा मुखवटा फक्त वोटबँकेच्या अजेंडासाठी
सुरक्षिततेसाठी सार्वजनिक चिंता
घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले, जे लोक सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असतात, तेच जर सुरक्षित नसतील तर मग जनतेचं काय? राज्यात गुन्हेगारी इतकी बळावली आहे की पोलिस अधिकाऱ्यांचा देखील जीव धोक्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, कायद्याची भीती उरलेली नाही. गुन्हेगारांची मनोबल इतकी वाढली आहे की त्यांनी भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याचाच जीव घेतला. हे राज्य सरकारच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे.
अमरावतीसह संपूर्ण राज्यात या घटनेनंतर भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांवरच जर खुलेआम हल्ले होत असतील तर सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षिततेचं काय? असा सवाल प्रत्येकाच्या मनात घर करत आहे. नागरिकांनी ठामपणे मागणी केली आहे की, या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यामुळेच इतर गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल आणि शहर पुन्हा सुरक्षित होईल.पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. काही ठोस पुरावे हाती लागल्याची माहितीही सुत्रांकडून समजते आहे. मात्र या घटनेने पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.