
अमरावतीत सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं तरी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
राजकारणाचा रंग पुन्हा गडद होतोय. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. हजारो शेतकऱ्यांची आशा आणि धगधगत्या प्रश्नांवर तोडगा मिळावा यासाठी त्यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन सध्या तूर्तास थांबवण्यात आलं आहे. पण, ही विश्रांती नाही, ही फक्त पुढच्या संघर्षाची तयारी असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितले. बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं की, पावसाळा जवळ आला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आपल्या गावी परतणं आवश्यक आहे. त्यामुळे आंदोलन अर्धवट थांबवावं लागलं. मात्र, आंदोलन मागे घेतलेलं नाही. फक्त पुढे ढकललं आहे. असा स्पष्ट इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. अमरावती सहकारी बँकेतून सुरू झालेला दबाव आता थेट राज्याच्या मुख्य दालनात पोहोचल्याचा दावा करत त्यांनी सांगितले राज्याच्या मुख्य अधिकाऱ्याच्या उपस्थितीत दोन आमदारांनी माझ्याविरोधात चर्चा केली. त्या अधिकाऱ्याने म्हटलं, बच्चू कडू यांना सप्टेंबरपर्यंत जेलमध्ये पाठवायचं आहे. त्यासाठी प्रशासनिक पातळीवर अडचणी निर्माण करा. हा आरोप करताना त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण ‘समझने वालों को इशारा काफी होता है’ असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.

शिंदे गटाची मध्यस्थी
कडू यांचं वक्तव्य स्पष्ट करतं की हा संपूर्ण डाव सत्ताधारी भाजपकडून रचला जातोय, असा त्यांचा ठाम आरोप आहे. कडू पुढे म्हणाले, अमरावतीतल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला आधीच सावध केलं होतं. ‘जास्त बोलू नका, अडचणीत याल’ असं ते वारंवार सांगायचे. पण आमचं धोरण स्पष्ट आहे सामान्य माणसासाठी लढणं. आईकडून मिळालेली शिकवणही त्यांनी यावेळी आठवली ‘सार्वजनिक जीवनात भगतसिंगासारखं लढायचं.’ हे आमच्या रक्तात आहे. हा काळ आमचं सत्व तपासणारा आहे. पण आम्ही यातून अधिक प्रबळ होऊन बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला विरोधकांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला.
महाविकास आघाडीने त्यांच्यासोबत उभी राहत आंदोलनाला बळ दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरला, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भेट दिली. मात्र भाजपचा अधिकृत पाठिंबा धूसर राहिला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मध्यस्थीने आंदोलन काही काळ स्थगित झालं असलं, तरी बच्चू कडू यांनी केलेले आरोप हे सत्ताधारी यंत्रणेच्या दिशेने रोखलेले आहे, हे जाणकार सांगतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या थकीत अनुदानासाठी लढा देणाऱ्या या आंदोलनाची ही केवळ झलक होती, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिला हा अर्धविराम आहे. आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यासाठी आम्ही अधिक सज्ज होऊन येऊ.