
शेतकरी न्यायासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन तूर्तास थांबवत 5 जुलैपासून सातबारा कोरा करा पदयात्रेची घोषणा केली आहे.
राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचं नाट्य सादर होतंय. केंद्रस्थानी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पेटलेल्या या लढवय्या नेत्याने पुन्हा एकदा सरकारच्या मनोऱ्याला हादरवून टाकणारा इशारा दिला आहे. हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या आशा-अपेक्षा आणि वेदना यांना वाचा फोडण्यासाठी सुरू झालेलं त्यांचं अन्नत्याग आंदोलन तूर्तास थांबवण्यात आलं आहे. पण ही विश्रांती नक्कीच थांबवलेपण नाही, हे स्वतः कडूंनी स्पष्ट केलं आहेही विश्रांती नाही. ही पुढच्या संघर्षाची तयारी आहे. पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या गावी परतून पेरणीला सुरुवात करणं गरजेचं झाले आहे. त्यामुळे आंदोलन अर्धवट थांबवण्यात आलं, मात्र कडू यांचा निर्धार कायम आहे.
आंदोलन मागे घेतलेलं नाही, ते केवळ पुढे ढकललं आहे. सरकारकडून मिळालेल्या आश्वासनावर विश्वास ठेवल्याचं सांगतानाच त्यांनी असा इशाराही दिला की, सरकारने जर हे आंदोलन हिंसक करण्याचा डाव आखला असेल, तर त्याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. एका पत्रकार परिषदेत बच्चू कडूंनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफी देऊ असं सांगितले. पण योग्य वेळ म्हणजे नेमकी कधी? गेल्या सहा महिन्यांत तब्बल एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारीच स्वतः सरकारच्या अपयशाची पोचपावती आहे.

दोन ठोस मुख्य मागण्या
कडूंनी थेट सवाल केला, आणखी किती मृतदेह पाहिल्यावर सरकारला योग्य वेळ येईल? या पाश्र्वभूमीवर बच्चू कडूंनी 5 जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘सातबारा कोरा करा’ यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा केवळ आंदोलन नसून, एक व्यापक लोकचळवळ ठरणार आहे. 138 किलोमीटरची ही पदयात्रा विदर्भातील पीडित घटकांसाठीचा आवाज ठरणार आहे. शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय यांचे हक्क सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे. ही ऐतिहासिक यात्रा भारतरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथून सुरू होणार आहे. यात्रेचा शेवट होणार आहे चिलगव्हाण या गावात.
जिथे महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. हे ठिकाण केवळ एक गाव नाही, तर शेतकरी प्रश्नांच्या वेदनांचं प्रतीक बनले आहे. ही यात्रा उंबरडा बाजार, बोदेगाव, दारव्हा, तिवरी, तूपटाकळी, काळी दौलत, गुंज अशा महत्त्वाच्या गावांमधून मार्गक्रमण करेल. सात दिवसांत ही यात्रा 138 किमीचा लांब पल्ला पार करणार आहे. प्रत्येक थांब्यावर जनसंवाद, सभा, आणि स्थानिक समस्यांवर चर्चा आयोजित केली जाणार आहे. यात्रेची केंद्रबिंदू म्हणजे दोन ठोस मागण्या. सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि संपूर्ण कर्जमाफी लागू करावी. पण हेच नाही, तर शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण आणणारी धोरणं लागू करणे.
विधवा व अपंगांसाठी रोजगार आणि सुरक्षा योजना राबविणे. मनरेगाअंतर्गत शेतीकामांमध्ये वाढ करणे, आणि तरुणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या मागण्याही मांडल्या जाणार आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत ‘सातबारा कोरा करा’ ही यात्रा केवळ एक आंदोलन न राहता, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठीचा एक ठोस आणि प्रभावी आवाज बनण्याच्या दिशेने पुढे सरकणार आहे. बच्चू कडू, ज्यांनी कधीच राजकारणात संकोच न ठेवता बिनधास्तपणे लढा दिला, त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुन्हा उभारी घेणार, हे निश्चित.