मतचोरीच्या आरोपांमध्ये आता नवे वादळ उठले आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दहा हजार मतदार वगळण्याची सरकारकडून ऑफर मिळाल्याचा स्फोटक दावा केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमितता, बोगस नावे आणि अतिरिक्त मतदान याबाबतचे पुरावे सादर केले. त्यानंतर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलेला दावा आणखी वादळ निर्माण करणारा ठरला आहे.
कडू यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे दहा हजार मतदारांची यादी मागण्यात आली होती. मतदान न करणाऱ्या व्यक्तींना वगळून त्यांच्या जागी इतर नावे समाविष्ट करण्याची ऑफर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हा प्रस्ताव थेट सरकारमधील व्यक्तींनीच दिला होता, असे कडूंचे म्हणणे आहे. त्यामुळे मतदारयादीतील फेरफार केवळ अफवा नसून त्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
मतदारयादीतील फेरफाराची ऑफर
बच्चू कडूंच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशी झालेल्या संवादात निवडणुकीत आपल्याला अनुकूल निकाल मिळवण्यासाठी खास युक्ती सुचविण्यात आली. त्यात जे मतदार त्यांच्याशी संपर्कात नाहीत किंवा मतदान करणार नाहीत, अशांना यादीतून वगळून टाकावे आणि त्यांच्या जागी इतर नावे समाविष्ट करावीत, असे सुचविण्यात आले होते. या प्रक्रियेद्वारे दहा हजार मते वजा करून तितकीच नवीन मते घालण्याची ऑफर करण्यात आली होती. या प्रकारावरूनच मतदारयादीच्या शुद्धतेबाबत गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत. निवडणुकीतील मतांचे गणित कसे बदलले जाऊ शकते. त्याचा निकालावर किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे या खुलाशामुळे उघडकीस आले आहे.
कोविडनंतर झालेल्या निवडणुकीत विविध अनियमिततेचे आरोप आधीच गाजत होते. मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यानंतर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी, एका व्यक्तीच्या नावाची अनेक मतदारसंघात झालेली नोंदणी आणि अतिरिक्त मतदानाची प्रकरणे उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला होता. आता बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मतदारयादीतील फेरफार आणि बनावट नोंदींच्या माध्यमातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवरच आघात होत असल्याचे या घटनाक्रमातून दिसून येते. मतदारांचे खरे प्रतिनिधित्व हरवून सत्तेसाठी कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो.
राजकीय वर्तुळातील खळबळ
मतदारांची नावे वगळून नव्याने समाविष्ट करण्याची प्रक्रिया केवळ प्रशासनाच्या यंत्रणेशिवाय शक्य नाही. त्यामुळे हा संपूर्ण कट रचण्यात सरकारमधीलच काही व्यक्ती सहभागी असल्याचा संशय बळावला आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी मतचोरीचे गंभीर आरोप करून त्यासंबंधी पुरावे मांडले होते. त्यानंतर आता कडूंचा दावा प्रकाशझोतात आल्याने निवडणुकीबाबत मतदारांचा विश्वास अधिकच ढासळण्याची शक्यता आहे. मतदानाच्या प्रक्रियेत फेरफार झाल्यास लोकशाहीवरील जनतेचा विश्वास डळमळीत होतो. बच्चू कडू यांच्या या खुलाशानंतर केवळ संबंधित निवडणुकीवरच नव्हे तर भविष्यातील निवडणुकींवरही संशय निर्माण झाला आहे. या गंभीर आरोपांवर सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे ही काळाची गरज आहे.
