
महायुतीमध्ये भाजपने 11 आमदारांना महत्त्वाच्या विधिमंडळ समित्यांची जबाबदारी दिली आहे. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गट अद्याप प्रतीक्षेतच आहेत, त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपने आपल्या वर्चस्वाचा डंका वाजवला आहे. भाजपच्या 11 आमदारांना महत्त्वाच्या विधिमंडळ समित्यांची जबाबदारी देण्यात आली असताना, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मात्र अद्याप वेटिंग मोडवरच आहेत. महायुतीतील प्रमुख घटक पक्षांना समित्यांमधून बाजूला ठेवत भाजपने सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा एक नवा डाव आखला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
राजकीय वर्तुळात हे वाटप भाजपच्या आक्रमक राजकीय रणनीतीचा भाग मानले जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे निर्णय घेतले गेले आहेत. महायुतीत असलेल्या मित्रपक्षांना कोणतेही स्पष्ट उत्तर न देता भाजपने आपली एकतर्फी सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

मित्रपक्षांना वाटा नाही
वाटप जाहीर होताच महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने एकूण 29 समित्यांपैकी 11 महत्त्वाच्या समित्यांवर आधीच ताबा मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फक्त नऊ-नऊ समित्या येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरही कोणतीही ठोस घोषणा अद्याप झालेली नाही. या स्थितीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
भाजप मित्रपक्षांना केवळ नामधारी भागीदार म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘महायुती’ फक्त नावापुरती असून, प्रत्यक्षात सत्ता आणि निर्णयक्षमता केवळ भाजपच्या हाती असावी यासाठी हा संपूर्ण खेळ खेळला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Nagpur rural: ग्रामपंचायतींना वेठीस धरले, विकासाचे चाक थांबले
भाजपचा खेळ
अजित पवार आणि शिंदे गटाने भाजपसोबत युती करताच त्यांच्या समर्थकांना मोठ्या पदांची स्वप्ने दाखवली गेली होती. मात्र, मंत्रिपदाच्या विभाजनातच त्यांची निराशा झाली होती. आता विधिमंडळ समित्यांच्या वाटपातही त्यांची अवहेलना होत असल्याने, त्यांनी भाजपसोबत युती करून मोठी चूक केली का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महायुतीच्या गोटात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिंदे गट आणि अजित पवार गटाने उशिरा का होईना, परंतु भाजपच्या या राजकीय खेळाची जाणीव करून घ्यावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांतूनच होत आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते मात्र या आरोपांचे खंडन करत असून, सर्व मित्रपक्षांना योग्य तो वाटा दिला जाईल, असे दावे करत आहेत. पण वास्तव मात्र वेगळे असल्याचे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे.
सत्तेत रस्सीखेच
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना समित्यांसाठी नावे सुचवण्यास सांगितले गेले असले, तरी त्यांना भाजपच्या एकतर्फी निर्णयांची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. यामुळे या पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून, ते लवकरच आपली पुढील रणनीती ठरवतील, असे बोलले जात आहे.
याचा थेट परिणाम राज्याच्या सत्तासंघटनेवर आणि आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. भाजपच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना नाराज करून भाजप स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरत आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकंदरीत, भाजपने आपल्या मित्रपक्षांना जाणीवपूर्वक मागे टाकत सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा जो डाव आखला आहे, तो कितपत यशस्वी ठरेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, महायुतीतील हे अंतर्गत कलह महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे वळण देण्यास तयार असल्याचे निश्चित.