
वर्धा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चुरशीची स्पर्धा रंगली आहे. बावनकुळे यांच्या बैठकीनंतर इच्छुकांची हालचाल वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदासाठी रंगलेली स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे एकमुखी निर्णय असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे गटबाजी आणि अंतर्गत चढाओढीची छायाचित्रं स्पष्टपणे समोर येत आहेत. मंगळवारी मुंबईत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत निरीक्षक अरुणसिंग आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील पदाधिकार्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत भावी जिल्हाध्यक्षासाठी आवश्यक निकष जाहीर करण्यात आले.
बैठक होऊन अवघे काही तास होत नाहीत, तोपर्यंत इच्छुकांनी आपापल्या हालचाली सुरू केल्या. भाजपमध्ये सध्या एक राज्यमंत्री, चार आमदार, दोन माजी खासदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना समतोल राखणे आवश्यक बनले आहे. गेल्या अनेक वर्षांत जिल्हाध्यक्षपदावर तेली व कुणबी समाजाचे वर्चस्व होते. मात्र यंदा इतर समाजांनाही संधी द्यावी, असा सूर गटांतून निघू लागला आहे.

नव्या नावांच्या चर्चेला उधाण
यंदाच्या शर्यतीत पुलगावचे संजय गाते हे नाव चर्चेत आहे. ते संघाचे कार्यकर्ते आणि ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा वापर जिल्हाध्यक्षपदासाठी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांचे नावही पुढे आले आहे. आर्वीतील भाजप आमदारांच्या गटातील ही महत्त्वाची उमेदवारी ठरू शकते.
भाजपमध्ये सर्वाधिक काळ महासचिवपद भूषवणारे अविनाश देवही या शर्यतीत आहेत. ते आपले अनुभव व निकषांचे पालन या दोन्ही गोष्टी स्पष्ट करत आहेत. माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे हे देखील मी इच्छुक आहे,असा जाहीर दावा करत आहेत. त्यांच्या शांत आणि शिस्तबद्ध कारकिर्दीची नोंद पक्ष घेत आहे. याचवेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांचाही नाव चर्चेत आहे. नागपूर स्थित ज्येष्ठ नेत्यांशी असलेल्या जवळिकेचा त्यांच्या नावाला फायदा होण्याची शक्यता आहे.
वर्तमान अध्यक्षही शर्यतीत
सध्या जिल्हाध्यक्ष असलेले सुनील गफाट यांची संधी परत मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी यासंदर्भात पक्ष जो निर्णय घेईल तो स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार सुमित वानखेडे यांनी कोणत्याही नावाचा आग्रह न धरता सर्वानुमतीने निर्णय घेण्याचा सूर स्पष्ट केला आहे.
मुंबई बैठकीत सक्रिय सदस्य असणे, संघटनेत अनुभव असणे, 60 वर्षाखाली वय, आणि वर्तमानात पद न भूषवलेले असणे असे निकष जाहीर करण्यात आले. याशिवाय महिला, अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधित्व आणि गटबाजीपासून दूर असलेले कार्यकर्ते यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माजी मंत्री मदन येरावार यांची प्रमुख निवडणूक संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या
निवड प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक, सर्वसमावेशक आणि संघटनेच्या मूल्यांनुसार पार पाडली जावी, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यांचे नेतृत्व भाजप जिल्ह्याच्या नव्या युगाची दिशा ठरवेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.