महाराष्ट्रात लवकरच महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार यावर महसूलमंत्र्यांनी मोठे वक्तव्य करून स्पष्टता दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुमधडाका सुरू आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून, कार्यकर्ते आणि नेते मेहनतीला लागले आहेत. महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकींसाठी उमेदवारी कोणाला मिळेल आणि कोण कुठून लढेल, याबाबत अद्याप गुप्तता कायम आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक धडाकेबाज वक्तव्य करून राजकीय वातावरणात खळबळ माजवली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या किंवा वेळोवेळी पक्ष बदलणाऱ्या दलबदलूंना तिकीट मिळणार नाही. याआधीही त्यांनी असेच वक्तव्य केले होते. पण आता त्यांनी आणखी खरमरीत बोलून नेत्यांच्या मागे लागणाऱ्यांना धक्का दिला आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, आमदार किशोर जोरगेवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर किंवा मी स्वतःसुद्धा कुणाला तिकीट देऊ शकत नाही. नेत्यांच्या मागे लागणाऱ्या आणि मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणारच नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. भाजप लवकरच एक सर्वेक्षण करणार असून, त्यात जनतेच्या मनात आघाडी घेणाऱ्याच उमेदवारांना संधी मिळेल. या वक्तव्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. जे कार्यकर्ते नेत्यांच्या गाडीत फिरतात किंवा त्यांच्या मागे लागून उमेदवारीची अपेक्षा करतात, त्यांच्यासाठी हे वक्तव्य म्हणजे धक्कादायक आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बावनकुळे यांनी हे मोठे विधान केले.
Eknath Shinde : ट्विटर अकाउंटवर पाकिस्तान-तुर्की झेंड्यांनी गाजवला गोंधळ
जनतेचा विश्वास जिंकणे
दरम्यान मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छबू वैरागडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात बावनकुळे म्हणाले, नेत्यांच्या मागे लागणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता तिकीट मिळेल अशी अपेक्षा करू नये. जनताच आता तिकिटांचा निर्णय घेईल, असे ते म्हणाले. विभागीय पातळीवर पक्षाच्या सर्वेक्षणांवर आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष पाठिंब्यावर आधारित तिकिटांचे वाटप होईल. माझ्या गाडीत कुणी फिरत आहे किंवा प्रवास करीत आहे, म्हणून त्याला तिकीट दिले जाईल, या भ्रमात कुणी राहू नये, असे ते म्हणाले.
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, भाजपचे उद्दिष्ट केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर जनतेचा विश्वास जिंकणे आणि पारदर्शक व्यवस्था स्थापित करणे आहे. त्यामुळे, केवळ वरिष्ठ नेत्याशी जवळीक किंवा नेत्यांच्या मागे लागणाऱ्या आधारावर तिकीट मिळणार नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवून काम करावे. या विधानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक कार्यकर्ते आता संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या पाठिंब्यावर भर देत आहेत. गटबाजीच्या या वातावरणात, हे विधान आगामी निवडणुकीसाठी नवीन रणनीती आखण्याचे संकेत देत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक आजी-माजी नगरसेवक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट मिळेल या आशेवर गट बदलले आहेत. या गटातून त्या गटात उड्या मारणाऱ्या दलबदलू नेत्यांच्या चेहऱ्यावर बावनकुळे यांच्या वक्तव्याने रंग उडाला आहे.
भाजपच्या या नव्या दृष्टिकोनामुळे इतर पक्षांनाही विचार करावा लागेल. नेत्यांच्या प्रभावाऐवजी जनतेच्या मतांना प्राधान्य देणे, हे लोकशाहीसाठी सकारात्मक पाऊल आहे. बावनकुळे यांचे वक्तव्य केवळ शब्द नाहीत, तर पक्षाच्या अंतर्गत सुधारणांचे संकेत आहेत. आता कार्यकर्त्यांना मेहनत आणि जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागेल.