
राजकारणात गणित झटपट बदलतं, पण छगन भुजबळ यांच्या मिश्किल शैलीला तोड नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्या संभाव्य पुनर्मीलनावर भुजबळांनी विनोदाच्या अंदाजात दिलेलं उत्तर नव्या चर्चांना हवा देत आहे.
महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एका विशाल रस्त्यासारखं आहे. इथे कोण कुठल्या चौकात वळणार, कोणाशी हातमिळवणी करणार, तर कोण पाठ फिरवणार, हे सांगणं कठीण आहे. राजकारणात कोण कधी कोणाचा होतो आणि कोण कधी कोणाचा राहत नाही, हे नशीब आणि गरज यावर ठरतं. अशा खेळत्या प्रवाहात कधी एखादा नेता बंड करतो, कधी एखादी व्यक्ती जुन्या सहकाऱ्यांकडे परत जाते, तर कधी विरोधकांचेच हितसंबंध जुळून येतात. ‘बदल हीच राजकारणाची खरी ओळख,’ असं म्हणायला हरकत नाही.
राजकारणाच्या याच प्रवाहात आता एक मोठी चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार का? पुण्यात नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाली. ही भेट राजकीय होती की तांत्रिक? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. छगन भुजबळ यांनी तर यावर मिश्कील प्रतिक्रिया देत, ‘जळगावात चांगले ज्योतिषी आहेत, त्यांना विचारतो’ असं म्हणत राजकीय गूढ अधिकच गडद केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
पुण्यात 22 मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका बंद दाराआड चर्चा केली. यानंतर लगेचच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या दोघांच्या भेटीबाबत विचारले असता अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, ‘ही केवळ कृषी क्षेत्र आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची बैठक होती.’ मात्र, यावर राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
राजकारणाचा अंदाज बांधणं अवघड असलं, तरी छगन भुजबळ यांचं उत्तर मात्र भन्नाट होतं. काका-पुतण्यांच्या संभाव्य एकत्रीकरणावर त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ‘पंचांग बघतो, जळगावमध्ये चांगले ज्योतिषी आहेत, त्यांनाच विचारतो’. भुजबळ हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत आणि समता परिषदेच्या मेळाव्यातून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. सध्या भुजबळ हे पक्षातील नेत्यांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिक संपर्कात आहेत, असेही बोलले जाते.
Devendra Fadnavis : शंकराच्या नगरीत गोदावरीच्या तीरावर सिंहस्थाची गुढी उभारली
अजित पवारांचे उत्तर
छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितलं, ‘जयंत पाटील आणि माझीही अनेकदा चर्चा होते. विधानसभेत ते माझ्या बाजूलाच बसतात. आम्ही शत्रू नाहीत. आम्हाला धडा मिळालाय.’ त्यांनी स्पष्ट केलं की, राजकीय मतभेद असले तरी चर्चा होणं काही वाईट नाही. प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या असल्या, तरी राजकारणात शक्यता कायमच असते.
अजित पवार या चर्चेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, कृषी उत्पादन वाढीसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि ‘एआयचा वापर ऊस, फळबागा आणि इतर पिकांसाठी कसा होऊ शकतो, यावर आम्ही चर्चा करत होतो.’ ते पुढे म्हणाले, ‘माध्यमांनी वस्तुस्थिती पाहूनच बातम्या द्याव्यात. आमच्या बैठकीचा चुकीचा अर्थ काढू नये.’
Sushant Singh Rajput Case : अनिल देशमुख यांच्या भूमिकेला समर्थनार्थ निवेदन
अर्थात, ही बैठक केवळ कृषीविषयक होती का, की त्यामागे काही मोठी राजकीय हालचाल होती, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. छगन भुजबळांनी आपल्या शैलीत भविष्यवाणी ज्योतिषांकडे सोपवली असली, तरी ‘सियासत में कोई भी चीज़ नामुमकिन नहीं होती’ हे मात्र नक्की.