महाराष्ट्रात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देत मदतीचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सांगितले. ‘बळीराजा पुन्हा उभा राहील’ असा आश्वासक संदेश दिला.
महाराष्ट्राच्या काळ्याकभिन्न मातीतून नेहमीच नवनिर्मितीचा सुगंध दरवळतो. संकटांच्या लाटांवर स्वार होऊन बळीराजा आपली अखंड ताकद पुन्हा पुन्हा सिद्ध करतो. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. पिके वाहून गेली. संसार उद्ध्वस्त झाले. पण या संकटाच्या काळातही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना धीर देताना सांगितले की, बळीराजा केवळ उभा राहणार नाही, तर अधिक सक्षम आणि मजबूत बनून पुढे येईल. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकार युद्धपातळीवर कार्यरत आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
सोलापूरच्या माढा तालुक्यापासून लातूरच्या औसा आणि निलंगा तालुक्यांपर्यंत पूरग्रस्त भागांचे दृश्य मन हेलावणारे आहे. वाहून गेलेली पिके, पाण्याखाली गेलेली घरे, हरवलेली गुरेढोरे आणि उद्ध्वस्त झालेले कुटुंबांचे आधार यामुळे प्रत्येकाच्या मनात विषण्णता पसरली आहे. परंतु, या दुखःच्या गर्तेतही आशेचा किरण दिसतो. सरकारने तात्काळ 2 हजार 200 कोटींची मदत जाहीर केली आहे. गरजेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव ठेवून, निकषांच्या चौकटीत न अडकता जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकारचा मानस आहे.
Chandrashekhar Bawankule : ठाकरेंनी मीडियाला नव्हे तर सरकारला पत्र लिहावं
शासनाचा कणखर पाठिंबा
या संकटकाळात सरकारने शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलली आहेत. शेती, घरे, शाळा, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी शासन कटिबद्ध आहे. टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीच्या संकटातही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आधार मिळेल. त्यांच्या आयुष्याला पुन्हा गती प्राप्त होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले की, शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवणे हा सरकारचा प्राधान्याचा विषय आहे.
उजनी येथे तेरणा नदीवर पूल बांधण्यासह गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. औराद शहाजनी येथे पूर संरक्षक भिंत आणि बॅरेजेसच्या निर्मितीला गती दिली जाणार आहे. तसेच, उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी पंचनाम्यासाठी पोहोचणे शक्य नाही. तिथे ड्रोनद्वारे किंवा मोबाइल फोटोंद्वारे नुकसानीचे मूल्यांकन केले जाईल. या नाविन्यपूर्ण उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना जलद मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
या कठीण काळात एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. शासनाची सर्व यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही. हे संकट तात्पुरते आहे. महाराष्ट्राची माती आणि बळीराजाचे मनगट यांच्या जोरावर नवे युग निर्माण होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलेला विश्वास प्रत्येकाच्या मनात आशा जागवतो. बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र अधिक सक्षमपणे पुढे जाईल.
