मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये पिंक ई-रिक्षा योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता प्रदान केली जाईल.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र सरकारने आज नागपूरमध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचललं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील दहा हजार गरजू महिलांना ही पिंक रिक्षा वितरित केली जाणार आहे. नागपूरमध्ये 50 महिला चालकांना रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. या भव्य उपक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीतील नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला.
पिंक ई-रिक्षा योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि सार्वजनिक वाहतुकीत त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हा आहे. राज्यात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर या आठ जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण दहा हजार पिंक रिक्षा वाटप करण्यात येणार आहेत.
सशक्त महाराष्ट्राचा मार्ग
पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत प्रत्येक रिक्षाच्या एकूण किमतीपैकी 20 टक्के अनुदान राज्य सरकारकडून दिलं जात आहे. लाभार्थी महिलांना केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. उर्वरित 70 टक्के रक्कम कमी व्याजदरात कर्जाच्या स्वरूपात देण्यात येत आहे. या आर्थिक सहकार्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात या योजनेला लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राबवण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. महिलांना केवळ रोजगार नव्हे, तर सुरक्षिततेचं साधन उपलब्ध व्हावं, हा यामागचा दुहेरी उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरांमध्ये महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या रिक्षा ही संकल्पना सामाजिकदृष्ट्या अत्यंत सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.
महिला सक्षमीकरणाला गती
राज्यातील महिलांच्या जीवनमानात परिवर्तन घडवण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल ठरत आहे. कामकाजी महिला, विधवा, घटस्फोटित व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील महिलांना या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करता येणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांचा सहभाग वाढवून महिला सुरक्षेला मजबुती मिळणार आहे.नागपूरमध्ये एकाचवेळी 50 पिंक ई-रिक्षा वितरित करून फडणवीस सरकारने आपल्या संकल्पांची अंमलबजावणी किती झपाट्याने होत आहे, हे दाखवून दिलं आहे.
पुढील टप्प्यात नागपूरमधील एकूण 2 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे उपराजधानीत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिला विकासाला मिळालेली ही नवसंजीवनी नागपूरसारख्या शहरासाठी प्रेरणादायक ठरत आहे. महिलांनी घरासोबत समाजाच्या विकासातही सक्रीय भूमिका बजावावी, या दृष्टीने ही योजना एक सकारात्मक झळाळी निर्माण करत आहे. महिलांसाठी, महिलांकडून चालवलेल्या रिक्षा ही संकल्पना केवळ यंत्रणा नव्हे, तर नव्या महाराष्ट्राची सशक्त झलक आहे.
