राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईतील डान्सबार प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा राजीनामा मागितला.
राज्यात सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कृती आणि वादग्रस्त विधानांनी सध्या सरकारची प्रतिमा डळमळाली आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील नेत्यांना वळण लावण्याचा प्रयत्न केला असला, तरी काहीजण वारंवार वादात सापडत असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरत आहेत. आधी माणिकराव कोकाटे आणि संजय शिरसाठ यांचे चर्चेत राहिलेले वाद. आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे नावही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत एक डान्सबार चालवला जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत केला.
डान्स बारवर त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि तब्बल 22 बारबालांना ताब्यात घेतले गेले. या प्रकरणानंतर योगेश कदम यांनी हळूच बारचा परवाना परत केला. पण यामुळे वाद शमला नाही. उलट त्याने आणखी पेट घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया दिली आणि थेट गृह राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारला उद्देशून कडाडून टीका केली. त्यांनी विचारले, जेव्हा मंत्री स्वतः कायदा पाळत नाहीत, तेव्हा सामान्य जनतेकडून काय अपेक्षा ठेवायची? त्यांनी कदम यांच्यावर हल्ला चढवत स्पष्ट शब्दांत म्हटले की, डान्सबारचा परवाना परत दिल्यामुळे पाप धुतले जात नाही.
सत्ताधाऱ्यांची शिस्त ढासळली
चोराने चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्हा माफ होतो का? वडेट्टीवारांनी हा मुद्दा केवळ एक मंत्री अपात्र असल्याचा नाही, तर संपूर्ण सत्ताधाऱ्यांची शिस्त ढासळल्याचा लक्षण म्हणून मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सातत्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील बेजबाबदार नेत्यांमुळे मलीन होते आहे. मग ते माणिकराव कोकाटे असोत, संजय शिरसाठ असोत किंवा आता योगेश कदम. या सगळ्यांनी सरकारची विश्वासार्हता धोक्यात आणली आहे, असे ते म्हणाले.
राज्याचे गृह राज्यमंत्री जेव्हा स्वतःच अशा वादग्रस्त प्रकरणात सापडतात, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर आहे, असा गंभीर सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. योगेश कदम यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. अनिल परब यांनीही पत्रकार परिषदेत यावर ठाम मत मांडले. त्यांनी आरोप केला की, कदम कुटुंबाने परवाना परत देऊन आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. जर व्यवसाय कायदेशीर होता, तर परवाना का परत दिला? असा थेट सवाल परबांनी विचारला.
Parinay Fuke : जनतेचा विश्वास ठरेल भाजपच्या महापालिका यशाचे गुपित