
भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष फोडण्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिखट उत्तर दिलं आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. नुकतेच भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला उद्देशून केलेल्या एका खळबळजनक विधानाने राजकीय वर्तुळात नवा गदारोळ निर्माण केला आहे. भाजप कार्यकर्ता संवाद बैठकीत त्यांनी खुलेपणाने सांगितले की, काँग्रेस फोडा आणि पक्ष रिकामा करा. बावनकुळेंच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षांत उभी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर, आता भाजप काँग्रेसलाही तोडण्याच्या मोहिमेवर असल्याचे चित्र समोर येत आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी बावनकुळेंच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. मतं चोरून सत्ता मिळवली असली तरी भीती अजूनही काँग्रेसचीच आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. काँग्रेस ही एक विचारधारा आहे. एक चळवळ आहे. ही चळवळ जिवंत आहे. देशही याच विचारधारेच्या जीवावर चालतो, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस खासदारांच्या मुळांचा उल्लेख करत त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले. कोणीही काँग्रेसला खाली करू शकत नाही, असंही त्या ठामपणे म्हणाल्या.काही दिवसांपूर्वीच भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला होता. यावरूनही भाजपच्या अंतर्गत गटांमध्ये नाराजीचे सूर उमटले.

राजकारणातील वाढत तणाव
बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना समजावले की, नवीन आलेल्या काँग्रेस नेत्यांना तिकीट देताना तुमचाच आधी विचार केला जाईल. या वक्तव्यानंतर प्रश्न उभा राहतो की, अजून कोणते काँग्रेस नेते भाजपच्या रडारवर आहेत? पक्षांतरांच्या राजकारणात महाराष्ट्राचा नकाशा अधिकच अस्थिर होताना दिसत आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर माओवादी अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पाकिस्तानशी संबंधित विविध गोष्टींवर बंदी जाहीर केली आहे.
भारताने यामध्ये आयात, विमान सेवा आणि यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यावरूनही यशोमती ठाकूर यांनी सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. पाणी आणि यूट्यूबच बंद करायचं होतं तर 500 कोटींचं राफेल 1 हजार 500 कोटींना घेऊन फक्त निंबू मिरची बांधायला ठेवले आहे का? अश्या शब्दांत त्यांनी टीका केली आहे. राजकारणाचा पारा चढलेला आहे. एकीकडे भाजप काँग्रेस फोडण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची नेतेमंडळी आणि विचारधारा प्रतिकार करताना अधिक सशक्त भासत आहेत. आगामी काळात महाराष्ट्राचं राजकारण आणखी धगधगणार, हे निश्चित.
Gunratna Sadavarte : विवाहाच्या छायेत दडलाय अतिरेक्यांचा अजेंडा