शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यांनी बाळासाहेबांचे मराठी जनतेसाठीचे योगदान अधोरेखित करत केंद्र सरकारवर टीका केली.
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना त्यांच्या कर्तृत्वावर भर दिला. बाळासाहेब ठाकरे हे फक्त शिवसेना पक्षाचे संस्थापक नव्हते, तर ते मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारे योद्धे होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य जनतेसाठी वेचले. त्यांनी कधीही कोणतेही पद स्वीकारले नाही, पण नेहमीच समाजहितासाठी संघर्ष केला, असे राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी करताना राऊत म्हणाले, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचे प्राण होते. त्यांनी मराठी माणसांसाठी व्यासपीठ उभारले आणि जनतेला न्याय मिळवून दिला. अशा थोर नेत्याला भारतरत्न देणे ही केवळ एक औपचारिकता नाही, तर तो त्यांचा खरा सन्मान ठरेल.
महाविकास आघाडीला मोठा धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांचा BJP मध्ये प्रवेश
मोदी, शाह यांच्यावर टीका
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजप नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. परंतु, या श्रद्धांजलीवर टीका करताना राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेना तोडण्यासाठी प्रयत्न केले. आज तेच बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहत आहेत, हे ढोंग आहे, असेही राऊत म्हणाले.
जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे लोक बाळासाहेबांना ट्विटरवर श्रद्धांजली वाहत असतील, तर तो सर्वात मोठा दिखावा आहे. बाळासाहेबांनी पक्ष बांधला, मराठी अस्मितेसाठी लढा दिला, आणि आज त्यांच्याच पक्षाला तुकड्यांमध्ये विभागले जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
भारतरत्नाची मागणी: शिवसेनेचा आग्रह
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न प्रदान करण्याची मागणी करताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी श्रद्धांजली देण्यापेक्षा त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन खरा सन्मान करावा.” राऊत यांच्या मते, बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी जनतेसाठी आणि हिंदुत्वासाठी जो लढा दिला, तो अकल्पनीय आहे.
या देशात बाळासाहेब ठाकरेंसारखे नेते पुन्हा जन्माला येणार नाहीत. त्यांनी आमच्यासारख्या सामान्य लोकांना नेतृत्व दिले आणि पक्ष मजबूत केला. त्यांनी कधी स्वतःसाठी पद भूषवले नाही, पण इतरांसाठी नेतृत्वाची संधी दिली, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांच्या पोस्टचा उल्लेख
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी एक्स (ट्विटर) वर श्रद्धांजली वाहिली. मी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
परंतु, राऊत यांनी पंतप्रधानांच्या या पोस्टवर टीका करत भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीने दाखवावी लागते. बाळासाहेबांना भारतरत्न देणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.
