
राहुल गांधींनी ‘मेक इन इंडिया’वर टीका करत मोदी सरकारवर घोषणाबाजीचा आरोप केला, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप ही नित्याची कहाणी असते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील खडाजंगी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेकदा धोरणांवरूनही पेटते. सध्या अशाच एका वादाचा केंद्रबिंदू ठरतो आहे ‘मेक इन इंडिया’ उपक्रम. गेल्या काही दिवसांपासून खासदार राहुल गांधी यांनी या योजनेवर तुफान टीका करत भाजप सरकारला जणू ‘घोषणांचा कारखाना’च ठरवले आहे. राहुल गांधींच्या मते, मेक इन इंडिया ही संकल्पना केवळ प्रचारापुरती वापरली जात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीचा फज्जा उडालेला आहे. त्यांनी असा थेट आरोप केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कामापेक्षा घोषणांमध्येच रमले आहेत.
भारताला भेडसावणाऱ्या आर्थिक संकटांवर मार्ग काढण्याऐवजी केंद्र सरकार जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम करत आहे, असंही गांधी म्हणाले.राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींना ‘मेक इन इंडिया’ म्हणजे काय हेच माहीत नाही, अशी खोचक टीका करत त्यांनी म्हटलं, यूपीएच्या काळात भारताची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावर होती. पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आज पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुढील दोन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर जाईल. राहुल गांधींनी बोलण्याआधी थोडं होमवर्क करणं आवश्यक असल्याचंही फडणवीसांनी उपरोधिकपणे सांगितले.

Prakash Ambedkar : काँग्रेसने वेळेत ऐकलं असतं, तर चित्र वेगळे असते
भाविकांसाठी सुरक्षित व्यवस्था
राजकीय आरोपांची ही धग असतानाच, दुसऱ्या बाजूला विकासाच्या आघाडीवरही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात नागपूरमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वाहतुकीसंदर्भातील विस्तृत नियोजन करण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाढती वाहतूक आणि यात्रेकरूंच्या गर्दीचा अंदाज घेता, सर्व प्रमुख रस्त्यांचं आधुनिकीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
प्रत्येक 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक येतात, त्यामुळे या आध्यात्मिक सोहळ्यासाठी वाहतुकीची सुविधा कार्यक्षम आणि सुरक्षित असावी, असे मत उपस्थित नेत्यांनी मांडले. सुदृढ रस्त्यांची उभारणी, समर्पित वाहन मार्ग, सुरक्षेची उपाययोजना आणि ट्राफिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसराचे रूपडे बदलण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.एकीकडे राजकीय टीकेचे वार सुरू असताना दुसरीकडे विकासाचे निर्णय घेतले जात आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी सरकारवर जोरदार आक्रमण करत आहेत. तर फडणवीस सरकार, महाराष्ट्रात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी तयारीला लागले आहे.
Devendra Fadnavis : भाषेविषयी तामिळनाडूचा संदर्भ मुख्यमंत्र्यांना पडला महागात