अमरावती जिल्ह्यात महिलांचे आर्थिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. त्यातच अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ग्रामीण महिलांच्या आर्थिक शोषणाची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गल्लीबोळात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जणू दुकानदारी थाटली आहे. या कंपन्या गावातील महिलांना व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या नावाखाली चक्रव्यूहात अडकवत आहेत. सरकारी बँका जाचक अटींमुळे कर्ज नाकारत असल्याने, या कंपन्यांनी ग्रामीण भागात आपले जाळे विणले आहे. 10-10 महिलांचे गट तयार करून त्यांना कर्जे दिली जातात.
परंतु 20 ते 25 टक्के व्याजदराने. हा प्रचंड व्याजदर कर्ज परतफेडीला जड ठरत असल्याने, या महिलांचे आयुष्य कर्जाच्या गर्तेत अडकले आहे. या कंपन्या सुरुवातीला मायेचा हात पुढे करतात. पण नंतर त्यांचा खरा चेहरा समोर येतो. ठराविक तारखेला हप्ता जमा न झाल्यास तगादा लावला जातो. कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. यामुळे महिला कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतात आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येते. प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे.
कर्ज वसुलीचा छळ
ग्रामीण भागातील या लाडक्या बहिणींची ही पिळवणूक पाहून कोणाच्याही मनाला चटका लागेल.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनी या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. लाडक्या बहिणींचे सरकार म्हणणाऱ्या महायुती सरकारला या बहिणींची पिळवणूक आणि फसवणूक दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महागाई, बेरोजगारी आणि हातबट्ट्याच्या शेतीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेवर मायक्रो फायनान्स कंपन्यांचा हा जाच आणखी एक संकट आहे. ठाकूर यांनी या कंपन्यांच्या लुटारू वृत्तीवर बोट ठेवले आहे.
कंपन्या सुरुवातीला मदतीचे आश्वासन देतात, पण नंतर प्रचंड व्याजदराने कर्जवसुली करतात आणि महिलांना कर्जाच्या खाईत ढकलतात, असे त्या म्हणाल्या. यशोमती ठाकूर यांनी या समस्येच्या मुळाशी जाऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप-महायुती सरकारच्या बाता म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ कर्ज वसुलीसाठी गावगुंड आणि खासगी सावकारांशी हातमिळवणी करून महिलांचा छळ केला जातो. ही लूट थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे की, व्याजदरांवर कडक निर्बंध लावावेत आणि कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच, ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांना खऱ्या अर्थाने व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
