
महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान न केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी दोघांवरही हिंदूत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला.
महाकुंभस्नान हा केवळ एक धार्मिक विधी नसून हिंदू संस्कृतीचा एक अभिमानास्पद सोहळा आहे. जिथे लाखो श्रद्धाळू आपल्या पापांचा प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी एकत्र जमतात. परंतु, हा अध्यात्माचा प्रवाह आता राजकीय डावपेचांचा केंद्रबिंदू बनला आहे. श्रद्धा आणि सत्तेच्या संघर्षात, महाकुंभस्नान हा हिंदुत्वाच्या निकषावर नेत्यांची परीक्षा पाहणारा एक नवा राजकीय हत्यार झाला आहे. मग, हा सोहळा खऱ्या आस्थेने पार पडतोय, की केवळ राजकीय पोत वाढवण्यासाठी वापरला जातोय.
भारतीय राजकारणात हिंदूत्वावरून वादंग उठवण्याची परंपरा कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी कुंभमेळ्यात जाऊन देखील त्रिवेणी संगमात स्नान केले नाही. मात्र दुसरीकडे स्वतःला हिंदूत्वाचा ठेकेदार समजणारे शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेही महाकुंभस्नान टाळताना दिसले. यावरून सत्ताधाऱ्यांनी या नेत्यांना हिंदू धर्माचा ढोंगी रक्षक असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांना हिंदूत्वाचा खोटा मुखवटा परिधान केल्याचा आरोप केला आहे.

सत्ता मिळवण्यासाठी ढोंग
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे म्हणाले, ‘स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं आव्हान दिलं होतं. मात्र, आज त्यांचेच वारस याच हिंदूत्वाची अवहेलना करत आहेत. केवळ राजकीय सोय पाहून हिंदूत्वाचा नारा लावायचा आणि गरज नसली की मागे हटायचं, ही ठाकरे गटाची नीती दिसते.’
शिंदेंच्या या वक्तव्याने ठाकरे गट पूर्णतः बचावाच्या भूमिकेत गेला आहे. ठाकरे गटाकडून यावर काही ठोस उत्तर समोर आलेलं नाही. मात्र, हे राजकीय आरोप-प्रत्यारोप निव्वळ महाकुंभमेळ्यापुरते मर्यादित नाहीत. यामागे भविष्यातील निवडणुकांची रणनीती दिसून येते. हिंदू मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा खेळ रंगतो आहे का, हा मोठा प्रश्न आहे.
राहुल गांधींवरही आरोप
ठाकरेच नाहीत, तर राहुल गांधी देखील भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी कुंभमेळ्याला हजेरी लावूनही त्रिवेणी संगमात स्नान न करण्याने त्यांच्यावर हिंदूविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देत गांधी परिवाराची पाठराखण केली आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की, मी स्वतः कुंभमेळ्यात जाऊन स्नान आणि दर्शन घेतले. मी संपूर्ण काँग्रेस कुटुंबाच्या वतीने तिथे गेलो होतो. गांधी कुटुंबाच्या वतीने प्रार्थना केली. पण, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांनी स्वतः स्नान का केलं नाही, याचा स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. यामुळे हिंदू धर्मावर त्यांचा विश्वास आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Nagpur rural: ग्रामपंचायतींना वेठीस धरले, विकासाचे चाक थांबले
भविष्यातील अजेंडा
पुढील काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदूत्व हा एक मोठा प्रचाराचा मुद्दा बनवला जातोय. भाजप आणि त्यांच्या साथीदार पक्षांसाठी हे सुवर्णसंधी आहे, जिथे विरोधकांना हिंदूविरोधी ठरवता येईल. शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदूत्वाच्या मुद्द्यावर अडचणीत टाकून एका मोठ्या राजकीय डावपेचाचा प्रारंभ केला आहे.
परंतु हा संघर्ष केवळ धार्मिक विचारांवर आधारित नाही, तर यात स्पष्टपणे राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना हिंदूविरोधी ठरवून भाजप आपली धर्माधारित राजकीय पकड मजबूत करत आहे का? की खरोखरच हे नेते हिंदू धर्माच्या गोष्टींना केवळ राजकीय हेतूसाठी वापरत आहेत? हे प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारायला हवेत.